लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या महामार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. शहरात याच महामार्गावर माेकाट गुरे सतत फिरत असल्याने तसेच राेडच्या मध्यभागी ठिय्या मांडून बसत असल्याने रहदारीस अडसर निर्माण हाेताे. शिवाय, अपघातानाही कारणीभूत ठरतात. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या माेकाट गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करीत गुरांचा कायम बंदाेबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांनी केली आहे.
या महामार्गावरील शहरातील पोलीस लाईन, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, बसस्थानक चौक, ड्रॅगन पॅलेस भुयारी मार्ग, कमसरी बाजार, वारिसपुरा चौक परिसरात माेकाट गुरांचा वावर वाढला आहे. ते २४ तास राेडवर फिरत असून, मध्यभागी बसून राहतात. त्यांना हाकलून अथवा वाहनांच्या तसेच हाॅर्नच्या आवाजामुळेही ते बाजूला हाेत नाही. त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते आक्रमक हाेऊन मारायला धावतात.
भरधाव वाहनांची या गुरांना धडक लागल्याने तसेच त्यांच्या राेडवर पडून राहणाऱ्या शेणावरून दुचाकी घसरूनही अपघात हाेत आहेत. या गुरांचे मालक कामठी शहरातच राहत असून, ते या गुरांची काेणतीही काळजी घेत नाही. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या गुरांच्या मालकांचा शाेध घ्यावा व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. शिवाय, या गुरांना पकडून त्यांना ग्रामीण भागातील काेंडवाड्यात बंदिस्त करावे, अशी मागणी कामठी शहरातील नागरिकांसह या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी केली आहे.