नागपूर विभागाचे पितळ उघडे : दिल्ली लाईनच्या बाजूला साचला तलावदयानंद पाईकराव - नागपूररेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे. अशुद्ध पाण्याचे ‘रिसायकलिंग’ करून रेल्वेगाड्या धुण्यात येतात, अशी शेखी मिरविणाऱ्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे पितळ उघडे पडले आहे. प्रत्यक्षात दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी रेल्वेस्थानकाच्या डी कॅबिन भागातील दिल्ली लाईनजवळ वाहून जात असल्याने तेथे तलाव साचल्याची स्थिती आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही एकाही अधिकाऱ्याला ही पाण्याची नासाडी थांबविण्याची गरज न वाटल्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सिग्नलच्या ‘रुट रिले इंटरलॉकींग’चे(आरआरआय) काम करण्यात आले.या कामासाठी या भागात पाण्याच्या पाईपमधून एक जोडणी दिल्ली लाईनच्या शेजारी देण्यात आली. २०१२ मध्ये ‘आरआरआय’चे काम पूर्ण झाले. तेंव्हापासून ही पाण्याची जोडणी बंद न केल्यामुळे तशीच सुरू असल्यामुळे या भागात पाण्याचा सारखा अपव्यय सुरू आहे. या भागात अनेक गुराखी आपली गुरे चारण्यासाठी येतात. गुरांना पिण्यासाठी पाणी सुरू करतात आणि ते बंद न करता तसेच निघून जातात. याशिवाय असामाजिक तत्त्वही या भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यात बिनधास्तपणे आंघोळ करतात. परंतू त्यांना अटकाव करण्याची तसदी कुणीच घेतलीनाही. रेल्वेस्थानकावर गार्ड लाईनच्या भागात एक जल पुनर्शुद्धीकरण केंद्र आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूच्या नाल्यातील ५ लाख लिटरअशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी रेल्वेगाड्या धुणे, रेल्वेरुळावरील घाण स्वच्छ करणे यासाठी वापरण्यात येते. एकीकडे ‘रिसायकलिंग’ करून पाणी वाचविण्याची शेखी मध्य रेल्वेचा विभाग मिरवतो आणि दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी करतो. रेल्वेच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून दररोज होणारी हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी होत आहे.
हजारो लिटर पाण्याची नासाडी
By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST