आनंद डेकाटे
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो सार आहे तो बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ते माध्यमांशी बोलत होते. ऑक्टोबर पर्यंत निवडणुका झाल्या पाहिजे, कारण खाली अस्वस्थता आहे. निवडणुका झाल्या तर नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका या माध्यमातून १३ हजार नवीन नेतृत्व तयार होतील, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक शिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही, म्हणून केंद्र, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केले तर व्यवस्थित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची आता दीड कोटी सदस्यता झाली आहे. संघटनपर्व पूर्ण झाले आहे, राहिला प्रश्न निवडणुकीचा तयारीचा तर उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे. महायुती तयार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
पक्ष प्रमुखाशी चर्चा करून वाद सोडवावेकुठलेही वाद चव्हाट्यावर वाढण्यापेक्षा बसून वाद सोडवता येतात, जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही. खरे तर मी कुठल्या पक्षाला सल्ला देणे योग्य नाही. रस्त्यावर जे वाद होतात ते न होता आपापल्या पक्षप्रमुखांशी चर्चा करून ते सोडवावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी दिला. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच सोडवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.