घर रिकामे करण्यासाठी गुन्हेगारांचा हल्ला : चौघांना अटक नागपूर : घर रिकामे करण्यासाठी गुन्हेगारांनी एका कुटुंबावर हल्ला करून आई व मुलाचे अपहरण केले. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीतील भगवाघर ले-आऊट येते घडली. पोलिसांनी चार आरोपीला अटक केली. शिवप्रसाद मुरली बेनकिरवार (२६) रा. पांढरकवडा यवतमाळ, भईमा यादव (२३) पंचशीलनगर, चंद्रपूर, नितीन ठाकूर (२३) त्रिमूर्तीनगर आणि सुरेश चौधरी (२५) पारधीनगर हिंगणा अशी आरोपीची नवे आहेत. ३८ वर्षीय सुलेख रॉय या आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. या घरावरून त्यांचा न्यायालयात वाद सुरू आहे. गुरुवारी रात्री आरोपी आपल्या तीन-चार इतर साथीदारांसोबत सुलेख यांच्या घरी आले आणि घर रिकामे करण्यासाठी वाद घालू लागले. घरात तोडफोड केली. आरोपी मारहाण करीत असल्याने रॉय आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले. आरोपींनी सुलेख व त्यांच्या वृद्ध आईला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि त्यांना यशवंत स्टेडियमजवळ नेऊन सोडले. येथून दोघेही आपल्या नातेवाईकाकडे गेले. तेथून सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस तातडीने सुलेख यांच्या घरी गेले. तेव्हा चारही आरोपी घरातील सामान फेकताना रंगेहात सापडले. आरोपींनी घरातील सामान फेकून कुटुंबीयांना बाहेर केले होते. पोलीस त्यांना ठाण्यात घेऊन आले. दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
संपत्तीच्या वादात अपहरण
By admin | Updated: September 3, 2016 01:00 IST