जाती अंतासाठी सत्यशोधक जनआंदोलन : मोटारसायकल रॅलीनागपूर : महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा विचार घेऊन खैरलांजी ते चैत्यभूमी अशा मोटारसायकल रॅलीला बुधवारपासून खैरलांजीतून प्रारंभ झाला असून ही रॅली बुधवारी नागपुरात पोहोचली. दीक्षाभूमीला अभिवादन करून ती अमरावतीकडे रवाना झाली. बुधवारी खैरलांजीतून सुरू झालेली ही संदेश यात्रा भंडारा, मौदा, रामटेक, कन्हान, कामठी या मार्गाने नागपुरात पोहोचली. सत्यशोधक जनआंदोलनाच्यावतीने काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व किशोर जाधव, सिद्धार्थ जगदेव, देवेंद्र इंगळे, नजूबाई गावित, ज्वाला मोरे, शैलेश सोनवणे करीत आहेत. तसेच रमेश बिजेकर, निर्भय बागडे, प्रवीण पाटील, अॅड. महेश बनसोड यांच्यासह २५० कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. अमरावती, अकोला, नाशिक मार्गे ही रॅली मुंबईला २६ जून रोजी पोहोचणार आहे. इंदोरा चौकात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. जातीनिर्मूलनासहित स्त्री-पुरुष समानता, वर्गीय विषमता नष्ट होईल तेव्हाच देश महासत्ता होईल. लिंगभेद, वर्गभेद ही दोन विषमतेची केंद्रे आहेत. जाती अंताचा लढा सांस्कृतिक लढा असून त्याविरोधात आता विद्रोह करण्याची जबाबदारी आहे. आधुनिक युगात जातीवरून अन्याय कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. ही राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी चिंताजनक बाब आहे. परंतु याचा विचार होत नाही. यामुळे जातीय अत्याचार वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
खैरलांजी ते चैत्यभूमी संदेशयात्रा
By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST