लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. या चौकात अपघाताची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याच शृंखलेत रविवारी रात्री जवळपास ११.३० वाजताच्या सुमारास या चौकात एका ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा जीवघेण्या अपघाताने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन मूग गिळून बसल्याच्या अवस्थेत आहे. समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलेही पाऊल उचलले जात नसून, रहदारी विभागही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गरज असतानाही या चौकात ट्रॅफिक पोलीस कधीच तैनात नसल्याचे दिसते. थोड्याच अंतरावरील ऑटोमोटिव्ह चौकात पोलीस चालान वसूल करण्यात व्यस्त असतात, हे विशेष.
एकता कॉलनी, यादवनगर ते पिवळी नदी क्षेत्राला जोडणाऱ्या रिंग रोडचे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु, चौकात अद्याप ट्रॅफिक सिग्नल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना येथून वहिवाट करताना संकटाचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांचा राबता असतो. विशेषत: हायवेकडे निघणाऱ्या ट्रकांची गर्दी मोठी असते. सिग्नल नसल्याने ट्रक वेगाने या चौकातून निघतात. याच कारणाने येथे अपघाताची संख्या वाढली आहे.
वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर
यशोधरानगर ठाण्यातील नोंदीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रिंगरोडच्या या चौकात अपघात झाला. आसीनगर निवासी मो. अनिस अन्सारी (६०) आणि मो. अकील अन्सारी (२०) हे दोघेही पिता-पुत्र दुचाकीने घराकडे जात होते. तेवढ्यात वीटभट्टी चौकाकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ४२, जी.ए. १८८८ ने त्यांना जबर धडक दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजली. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान अनिस अन्सारी यांचा मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील मुलगा अकील अन्सारीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. यशोधरानगर पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात कलम ३०४ (ए), ३३८, १३४, १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनीही घटनास्थळावर पूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगितले.
विरुद्ध दिशेने शिरतात ट्रक
रिंग रोडवर म्हाडा क्वॉर्टरला लागून एका शृंखलेत ट्रक उभे केले जातात. या दिशेने जाण्यासाठी ट्रकचालक विरुद्ध दिशेने ट्रक आणतात. त्यामुळे अपघाताचा प्रसंग ओढवला जातो. रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने ट्रक उभे केले जातात. अंधारात ट्रक दिसत नसल्याने बऱ्याचदा योग्य दिशेने जाणारी वाहने धडकतात. परंतु, या घटनांना रोखण्याचे उपाय योजले जात नाहीत. याच तऱ्हेने पंतप्रधान गृह योजना म्हाडा क्वॉर्टरसाठी रस्त्यावरच टिनचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळेही दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांना रिंग रोडकडे दोन्ही दिशेने येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळेही अपघात वाढले आहेत.
.........