नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी जीवनभर प्रयत्न केला. त्यांच्याच विचारांनी संविधानानुसार या देशातील दलित पीडितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार, असे आश्वासन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरी पहिल्यांदाच नागपुरात आले होते. आज बुधवारी त्यांनी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच मध्यवर्ती स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी अनेक कार्यकर्ते व संघटनांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना गडकरी म्हणाले, मी मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलो. दीक्षाभूमीसोबतच डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराचे दर्शनही घेतले. समता, समरसता आणि सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी जातीधर्मात, आर्थिक आधारावर किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव असू नये. मार्टिन ल्युथर किंग यांच्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी काम केले. त्यानुसार दलित पीडितांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील. नागपूरच्या जनतेने आपल्याला आईप्रमाणे प्रेम दिले. हे प्रेम आपण कदापि विसरू शकणार नाही. लोकांच्या विकासासाठीच केंद्रातील परिवहन खाते आपण स्वत: मागून घेतले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील आयएनएस विक्रांत या नौदलातील जहाजाच्या लिलावासंबंधी पत्रकारांनी छेडले असता, लिलाव होऊ नये, अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, आ. नाना श्यामकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी उपमहापौर संदीप जाधव, विलास गजघाटे, प्रा. अरविंद जोशी, एन.आर. सुटे, धर्मपाल मेश्राम, राजन वाघमारे, संदीप गवई, एस.व्ही. चिकटे, प्राचार्य मालती रेड्डी, रीना कुत्तरमारे, अशोक मेंढे, गिरीश देशमुख रमेश वानखेडे मिलिंद गाणार, प्रमोद तभाने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दलित पीडितांना देणार न्याय
By admin | Updated: May 29, 2014 03:22 IST