महापालिका : १६०० कोटींहून अधिक अर्थसंकल्पनागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे या विवंचनेत महापालिका प्रशासन आहे. असे असले तरी मनपाचा २०१४-१५ या वर्षाचा अर्थसंकल्प १६०० कोटीहून अधिक राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर ३० जूनच्या विशेष सभेत अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू केल्याने मनपाला २०० कोटींचा फटका बसला आहे. आर्थिक गणित बिघडले आहे. ३१ मार्चपर्यंत विविध स्रोतातून मनपा तिजोरीत ८०१ कोटींचा महसूल जमा झाला. उत्पन्न घटल्याने आयुक्त श्याम वर्धने यांनी २०१३-१४ या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प १०४७. ८० कोटीवर आणला तर २०१४-१५ या वर्षाचा १०६१.५१ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तो स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३५० कोटींनी कमी होता.अर्थसंकल्पात कपात केल्यानंतरही बोरकर १६०० कोटीहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. वर्धने यांनी अर्थसंकल्प सादर करताना तो वास्तव उत्पन्नावर आधारित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वर्धने यांच्या तुलनेत बोरकर यांचा अर्थसंकल्प ४५० कोटींहून अधिक राहणार आहे. बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता आताच अर्थसंकल्पावर बोलणे चुकीचे होईल. परंतु सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असाच अर्थसंकल्प सादर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.(प्रतिनिधी)निवडणुकीमुळे विलंबजून महिन्याच्या सुरुवातीलाच मनपाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. परंतु महापौर अनिल सोले पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे होते. आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प सादर करता आला नाही. अद्याप अर्थसंकल्पाची तारीख निश्चित झालेली नाही. २७ वा २८ जूनला अर्थसंकल्प सादर होईल, अशी चर्चा होती. परंतु बोरकर यांनी ३० जूनला सादर करण्याची तयारी दर्शविली आहे.
उत्पन्नाच्या दुपटीचा अर्थसंकल्प
By admin | Updated: June 26, 2014 01:14 IST