नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची, गहू, चणा, धान व ज्वारी या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
कुही तालुक्यातील वडेगाव या नुकसानग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. सदस्य मनीषा फेंडर, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार बी. एन. तिनघसे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, महावितरण उमरेडचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोड, उपकार्यकारी अभियंता भूपेश रंधये आदी उपस्थित होते.
२०१३-१४ तसेच आता २०२१ मध्ये पुन्हा निसर्गाने धोका दिला. त्यामुळे हाती आलेले मिरची, चणा व धान पीक गेले, असे वडगाव येथील शेतकरी लुटे यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. कुही तालुक्यातील वडेगाव, पचखेडी, परसोडी, नवेगाव, मदनापूर, माजरी, मांढळ, भांडारबोडी, सोनगाव, रेंगातूर व बोरीसदाचार या नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे. या गावातील ७०१ शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के म्हणजेच ३०४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
कुही तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित २२ हजार सात शेतकऱ्यांना १९ कोटी ७७ लाख १४ हजार ६३६ रुपयांचे बँकेमार्फत अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.