राजेश शेगोकारनागपूर : लय अवघड हाय गड्या उमगाया बाप ...' हे गाणे ऐकताना डोळे पाणावतात, कारण बाप एक साधा शब्द असला तरी त्यामागे कष्टांची, त्यागाची आणि वेदनेची कहाणी दडलेली असते. हाच बाप एखाद्या उपवर मुलीचा असतो तेव्हा या वेदनेला प्रसंगी असहायतेची किनारही असते. सध्या अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरू आहे अन् अशातच पुण्यातील वैशाली हगवणे या २३ वर्षांच्या तरुणीचा हुंड्यापायी गेलेला बळी चर्चेत आहे. मोठ्या घरची लेक अन् थोरा घरची सून असलेल्या वैशालीला लग्नात ५० तोळे सोने आणि फॉरच्यूनर गाडी दिली असताना तिने दोन कोटी रुपये आणावेत यासाठी तिचा छळ करण्यात आला. त्यातच तिचा बळी गेला.
हीच कहाणी कमी-अधिक प्रमाणात तुमच्या आजूबाजूलाही असेलच. हुंड्याची रक्कम कमी-जास्त असते मात्र मानसिकता सारखीच. बापाने लग्नात आयुष्यभराची लावलेली कमाई, माहेरची स्थिती अन् मुळात समाज काय म्हणेल या भीतीने अनेक मुली सगळा छळ सहन करतात अन् सहनशीलता संपली की गळफास जवळ करतात. पण जीव देण्याने प्रश्न संपत नाहीत. हे चित्र थांबले पाहिजे. हुंड्याचं दुष्टचक्र तोडायचं असेल, तर मुलींनीही आपली भूमिका ठामपणे मांडायला हवी. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि स्पष्ट विचार हीच हुंड्याविरोधातली खरी ढाल आहे. माझं लग्न मला विकायचं नाही, असा आवाज जर प्रत्येक मुलीने उंचावला, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही, फक्त तो आवाज करण्याचे स्वातंत्र्य पालक व समाजाने दिले पाहिजे.
मुळात कायद्याने हुंडा मागणे गुन्हा आहे, पण आजही अनेक ठिकाणी तो 'परंपरा' म्हणून जिवंत आहे. मुलीच्या वडिलांकडून रोख रक्कम, दागिने, वाहने इत्यादी थेट किंवा अप्रत्यक्षपणे मागितले जाते. अनेक वडील हुंडा न देण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण समाज, नातेवाईक आणि स्वतःची असहायता या तिन्ही गोष्टी त्यांना गप्प बसायला भाग पाडतात, 'स्थळ चांगले आहे; थोडंफार द्यावं लागतं' अशा वाक्यांनी हुंड्याला सामाजिक मान्यता दिली जाते आणि बाप गप्प बसतो. लेकीसाठी 'काहीही' करायला तयार होतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं बंधन, दोन जीवांचा सुखी संसार पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजात लग्न म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीचा, सामाजिक प्रतिष्ठेचा व्यवहार असा चुकीचा अर्थ लावला जातो. तो संपावा त्यासाठी बापानेही मुलींना शिकवावे, सर्वार्थाने सक्षम करावे. माझ्या लेकीच्या शिक्षण, संस्कार आणि स्वाभिमानापेक्षा मोठं काही नाही. हुंडा देणं शक्य नाही व गरजही नाही हा विश्वास जिथे असेल, तिथे लग्नाचा अर्थच बदलेल अन् एका बापाची कहाणी 'दमलेल्या 'पासून 'धीर देणाऱ्या 'पर्यंत पोहोचेल. अशा बदलासाठी गरज आहे, सुरुवात करण्याची आणि समाजानेही या विचारांचे स्वागत करण्याची.
नोंद न झालेल्या तक्रारींचे काय?राष्ट्रीय महिला आयोगाच्या २०२४ च्या अहवालानुसार, देशभरात २५,७४३ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी १७ % ४,३८३) तक्रारी हुंडा छळाशी संबंधित होत्या. महाराष्ट्रातून १,३१७ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यात हुंडा छळाच्या तक्रारींचा मोठा वाटा होता. पोलिसांमधील तक्रारी पहिल्या तर अवघ्या ५ महिन्यात ४ हजार ७३६ आकडेवारी गुन्ह्याची नोंद आहे शिवाय प्रत्यक्षात नोंद न झालेल्या तक्रारी कितीतरी असतील. हे चित्र भयानक आहे...