नितीन गडकरी : हिंगण्यात जाहीर सभानागपूर : केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे प्रयत्न यशस्वीरीत्या सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार असताना लोडशेडिंग नव्हते. आता पुन्हा एकदा राज्याची सत्ता द्या, संपूर्ण महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करून दाखवतो. देशातील सर्व महामार्ग सिमेंटचे बनविण्याचा आराखडा आज तयार आहे. नागपूर देशातील ‘स्मार्ट सिटी’ व्हावी, यासाठी पहिल्या १०० दिवसात विकासासाठी ४ हजार कोटी रु पयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. यासाठी के वळ दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. भाजपाकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने तुमची वस्ती, शहर, राज्य आणि देशही बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगण्यातील जाहीर सभेत केले. समीर मेघे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभामंचावर मध्य प्रदेशचे खासदार जनार्दन मिश्रा, माजी खा. दत्ता मेघे, माजी आ. विजय घोडमारे, सौंसरचे आ. नानाभाऊ मोहोड, माजी खा. रामखिलम पटेल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे, डॉ. राजीव पोतदार, सतीश जिंदल, प्रेम झाडे, पुरुषोत्तम रागीट, सुरत नितनवरे, राम यादव, आनंद कदम, कैलास मंथापूरकर, देवेंद्र बोरेकर, अशोक गोतमारे, विजय मेंढे, वैशाली मेंढे, सरिता यादव, संजय कफनीचोर आदी उपस्थित होते. या विकासकामांसाठी सर्वांनी भाजपाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. भाजपला जातीयवादी संबोधून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने दलित, बहुजन समाजाची दिशाभूलच केली आहे. भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सुलेखा कुंभारे म्हणाल्या. दत्ता मेघे म्हणाले की गडकरी हे विकासाची दृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातच विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. वेगळ्या विदर्भाची आमची मागणी आजही कायम आहे. छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाची भूमिका अनुकूल असल्यामुळे आपण आशावादी आहोत. (प्रतिनिधी)
दूरदृष्टी असेल तर देश बदलेल
By admin | Updated: October 12, 2014 01:17 IST