- ‘बिगबॉस उपविजेता’ राहुल वैद्य : भरपूर पाठिंबा दिल्याने व्यक्त केले आभार
अंकिता देशकर / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात जन्मलेला प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने बहुचर्चित रिॲलिटी शो ‘बिगबॉस १४’चे उपविजेतेपद पटकावले आहे तर दूरचित्रवाणी अभिनेत्री रुबिना दिलैक हिने विजेतेपद पटकावले. राहुलने प्राप्त केलेल्या या यशानंतर ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला.
रिॲलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले. विजेतेपद प्राप्त झाले नाही, हे शल्य नक्कीच राहील. पण, जिंकणे हाच एक हेतू बिगबॉसच्या घरात जाण्याचा नव्हता. मी तेथे होतो, ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रेम आणि पाठबळ मिळविणे, हा हेतू होता आणि मी असाच घडलो आहे, हे त्यातून सिद्ध झाले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये माझे कुटुंब सहभागी झाले, त्याचा अत्यानंद आहे. बिगबॉस हाऊसमध्ये असताना अस्वस्थताही होती. सर्वत्र लागलेल्या कॅमेऱ्यांनी खासगी आयुष्य असे राहिलेच नव्हते आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी अनियमित होत होत्या आणि पुरेशी झोपही होत नव्हती, असे राहुल म्हणाला. माझे आजी-आजोबा नागपुरातच राहतात आणि त्यामुळेच मी शहराला वारंवार भेट देत असतो. नागपूरकरांकडून मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील काही रेस्तराँनी माझ्यासाठी विशेष मोहीम राबवल्याचे कळले. राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना या रेस्तराँनी दिली होती. असे प्रेम मिळत असेल तर आणखी काय हवे, असा कृतज्ञतापूर्वक प्रतिप्रश्न राहुलने यावेळी व्यक्त केला. या शोचा ॲँकर सलमान खान याच्यासोबतच अनुभव अतिशय खास ठरला. त्याने सगळ्यांचे आदरातिथ्य केले आणि सर्वांना सहज वाटेल अशी वातावरणनिर्मितीही केली होती. ग्रॅण्ड फिनालेच्या समाप्तीनंतर सलमान खानने आईवडिलांसोबत एका खासगी पार्टीत भरपूर वेळही घालविल्याचे राहुल म्हणाला. भविष्यात संधी मिळाली तर सलमान खानसोबत काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मित्र आणि सर्वांसाठी चहा बनविण्याच्या प्रसंगाची खूप आठवण येते. भविष्यात आता कामावर लक्ष केंद्रित करण्यासेाबतच नव्या गाण्यांच्या प्रदर्शनाचा विचार करणार असून, आई-वडील, कुटुंबीय व गर्लफ्रेण्डसोबत भरपूर वेळ घालविणार असल्याचे राहुल म्हणाला. रिॲलिटी शो हा स्क्रिप्टेड असतो, हा केवळ भ्रम आहे. घरात घडणारी प्रत्येक घटना ही सत्य व अचानक घडणारी असल्याचेही राहुलने सांगितले.
-----------
स्टिकर
राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना नागपुरातील रेस्तराँनी दिली होती, ही आठवण यावेळी राहुल वैद्य याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
........