नरेश डोंगरे नागपूरकधी पोलीस असल्याची बतावणी करून, कधी धाक दाखवून तर कधी वेगवेगळे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे. वृद्धत्वामुळे असहाय बनलेल्या या बिचाऱ्यांना सहज लुटता येते, ते ध्यानात आल्यामुळे गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकांवर वक्रदृष्टी केली आहे. शुक्रवारी प्रतापनगरातील गंगादेवी आणि व्यंकटेश भोंडे यांच्या घरात दिवसाढवळ्या शिरून पिस्तूल तसेच चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी दागिने लुटून नेले. तत्पूर्वी सोनेगाव ठाण्याच्या हद्दीत पौनीकर कुटुंबाकडे अशीच घटना घडली. या घटनांमुळे उपराजधानीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस अधिकारी नेहमीच ज्येष्ठ दाम्पत्याच्या सुरक्षेचा दावा करतात. मात्र, वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमधून तो दावा पोकळ असल्याचे उघड होते. १८, २१ आणि २२ मे रोजी घडलेल्या घटनांमधून पुन्हा त्याचा प्रत्यय आला. रवींद्रकुमार जोगेवार (७०, सुमितनगर) हे बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी गुरुवारी २१ मेच्या सायंकाळी ते फेरफटका मारत होते. दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही पोलीस आहोत. येथे लुटमारीच्या घटना सुरू आहेत . तुम्ही अंगावर दागिने घालून खुशाल फिरता. काही झाले की पोलिसांच्या नावाने ओरडता‘, असे म्हणत जोगेवार यांना धाकदपट केले. त्यानंतर त्यांच्याजवळची सोनसाखळी, ब्रासलेट, हातघड्याळ असा पावणेदोन लाखांचा ऐवज घेऊन पळून गेले.शुक्रवारी २२ मेच्या सकाळी १० वाजता कोतवालीत अशीच घटना घडली. विजय किशोर मुंदडा ( ७१, रा. गणेशनगर) हे रेशीमबागकडे जात होते. मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही सीआयडीचे अधिकारी आहोत, असे सांगून त्यांनी जबरीने मुंदडा यांच्या बॅगमधील दागिने लुटून नेले. याच दिवशी भोंडे यांच्या घरात शिरून लुटारूंनी भोंडे दाम्पत्याचे दागिने हिसकावून नेले. मौल्यवान चिजवस्तू आणि रोकड शोधण्यासाठी त्यांनी भोंडे यांच्या घरात धुडगूसही घातला. तत्पूर्वी, सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मेच्या दुपारी थरारच घडला. निवृत्त बँक अधिकारी पुरुषोत्तम पवनीकर यांच्या घरात एक गुंड आला. घर बघायचे आहे, असे सांगून त्याने पवनीकर यांना वरच्या माळ्यावर नेले आणि त्यांच्या छातीत सुरा भोसकला होते.ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर लुटण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. आता घरात शिरून लुटारू त्यांना लुटू लागले आहे. त्यामुळे कुणीच नाही का आमच्या मदतीसाठी असा केविलवाणा सवाल, जेष्ठ नागरिक स्वत:च स्वत:ला विचारत आहेत. पोलिसांची भूमिकापोलिसांच्या रेकॉर्डनुसार उपराजधानीत एकूण ४०७० ज्येष्ठ नागरिक एकाकी आहेत. त्यातील १०० पेक्षा जास्त जणांची मुले विदेशात सेटल आहेत. अनेकांकडे केअर टेकरही आहेत. मात्र, तीन हजारांपेक्षा जास्त मंडळी अशी आहेत की ज्यांच्याकडे आयुष्याची जमापुंजी फारशी नाही. त्यामुळे एकाकीपणासोबतच ते रोजच्या जगण्यासाठीही संघर्ष करीत आहेत. त्यांना समाजकंटकाकडून त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात असलेल्या या हेल्पलाईनसाठी तीन पुरुष आणि एक महिला कर्मचारी नियुक्त आहेत. अडचणी सांगणाऱ्यांना तात्काळ मदत करण्याची, त्यांची नियमित वास्तपूस्त करण्याची जबाबदारी या ‘सेल‘वर आहे. हेल्पलेस हेल्पलाईनरात्रीबेरात्री काही अडचण आल्यास किंवा ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी असेल तर त्यांना या हेल्पलाईनची मदत मिळेल याची शाश्वती नाही. कारण जबाबदारी असलेले कर्मचारी दिवसाच कामावर दिसतात. विशेष म्हणजे, अनेकदा दिवसा फोन करूनही हेल्पलाईन ‘नो रिप्लाय‘ असते. मोबाईल, व्हॉटस्अपमध्ये गुंतलेल्या एका कामचुकार कर्मचाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांचे सारखे वाजणारे फोन टाळण्यासाठी एक शक्कल लढवली. या कर्मचाऱ्याने लॅण्डलाईन फोनचे बटन साईलेंट मोड वर टाकले. परिणामी त्या फोनचा आवाजच येत नाही. तक्रारी वाढल्यानंतर हेल्पलाईनमधीलच एका दुसऱ्या कर्मचाऱ्याने ही ‘कामचुकारी’ पकडली. त्याने शनिवारी तो फोनच काढून फेकला. त्या ठिकाणी दुसरा नवा फोन लाण्यात आला.
कसे मिळेल सुरक्षा कवच ?
By admin | Updated: June 1, 2015 02:46 IST