दिनकर ठवळे
कोराडी : महादुला,कोराडी,नांदा- कोराडी, सुरादेवी व लोणखैरी आदी गावातील ७० ते ८० कुटुंबातील सदस्यांचा लॉकडाऊन काळात मंदिर बंद असल्याने रोजगार बुडाला. या कुटुंबातील बहुतेक सदस्य नवीन रोजगाराच्या शोधात आहेत. रोजगाराअभावी यातील अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे.
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात हे दुकानदार हार-फुले ,रांगोळी,विविध खेळणी व देवीच्या पूजेचे साहित्य आदी विक्रीतून आपला रोजगार मिळवायचे. परंतू गत दीड वर्षापासून रोजगार बुडाल्याने यातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. यातील काही व्यक्तींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय निवडला तर अनेकजण रोजंदारीने कामाला जात आहे. मात्र तेही नियमित मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मातेचे मंदिर उघडण्याची या सर्वांना प्रतीक्षा आहे.
दुहेरी आघात
चार वर्षांपूर्वी कोराडी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. तेव्हापासून या दुकानदारासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मंदिराचे काम सुरू असल्याने मागील बाजूला असलेले दुकान हटविण्यात आली. या सर्वांना मंदिराच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर दुकान देण्याचे ग्रामपंचायतने मान्य केले. तेव्हापासून हे सर्व दुकानदार मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षेत होते. २०२० च्या प्रारंभी पर्यंत अनेक दुकानदारांना ग्रामपंचायतच्यावतीने गाळे देण्यात आले. हार फुलांचा व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि रोजगार उपलब्ध होईल या आशेवर असतानाच मार्च २०२० पासून लॉकडाऊनंतर मंदिर बंद झाल्याने फूल-हार विक्रेत्याचा व्यवसाय बुडाला.
काहींनी दुकाने दिली भाड्याने
ग्रामपंचायतीने या दुकानदाराला गाळे वाटप करताना काही अटी टाकल्या होत्या. यात ज्या व्यक्तीला गाळे वाटप करण्यात आले आहे अशा व्यक्तीला तो गाळा त्यांच्या कुटुंबाच्या रोजगारासाठी देण्यात आला असल्याने ते इतरांना भाडेतत्त्वावर देता येणार नाही असे सांगितले होते. मात्र असे असले तरी काहींनी मात्र येथील दुकाने भाड्याने दिल्याचे दिसते.
काही भाडे माफ करणार
यासंदर्भात कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले यांच्याशी संपर्क केला असता ज्या काळात मंदिर बंद होते अशा काळातील भाडे सर्व दुकानदारांना माफ करण्याची ग्रामपंचायतची भूमिका आहे. परंतु ज्या काळात मंदिर सुरू होते, दुकानही सुरू होते अशा काळातील अनेक दुकानदारांनी भाडे थकविले आहे, दुकाने सुरू असण्याच्या कार्यकाळातील भाडे ग्रामपंचायत माफ करणार नसल्याचे धानोले यांनी स्पष्ट केले.