मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अखिल भारतीय वेद संमेलनाला सुरूवात नागपूर : प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्तीचा विनाश याची कारणमीमांसा सांगणारे, प्रकृतीचे संवर्धन, व्यक्ती-समाज-राष्ट्राला कुठल्या दिशेने जावे हे मूल्य वेदाने आम्हाला दिले आहे. वेद हे चिरंतर आहे. जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, प्रकृतीचे शोषण करू नये हे वेदांनी फार पूर्वीच सांगितले आहे. वेदातील वैज्ञानिक विचारांचा समाज आणि जगात प्रचार प्रसार व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेदातील विज्ञान पोहचावे, वेदातील भ्रांती दूर व्हावी, यासाठी प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. धर्मसंस्कृती महाकुंभात महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे वेद महर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. संमेलनाला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री देवनाथपीठाचे जितेंद्रनाथ महाराज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र मुळे, वेदाचार्य घैसास गुरुजी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर मिश्र, आयोजक मोरेश्वर घैसास, निमंत्रक कृष्णाशास्त्री आर्वीकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. उमा वैद्य म्हणाल्या की, वेद हे विश्वाचे आद्य वाङ्मय आहे. एखादी विद्या १० हजार वर्षे टिकवून ठेवणे हे केवळ भारतातच शक्य झाले आहे. तेही केवळ वैदिक पंडितांनी केलेल्या तपस्येतून शक्य झाले आहे. वैदिक पंडितांच्या माध्यमातून वेदांचे रक्षण होत आहे. मात्र वेदांना समाजमान्य करण्यासाठी वैदिक विषयांमध्ये संशोधन करणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. वेदांमध्ये विज्ञानाचे विषय आहे. त्याची चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी संस्कृत अकादमीची घोषणा केली आहे. त्यातच वेदांच्या संशोधनाचे केंद्रसुद्धा स्थापन व्हावे, अशी अपेक्षा उमा वैद्य यांनी यावेळी केली. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपले अध्यक्षीय मत व्यक्त करताना म्हणाले की, वेद हे भारतातील सनातन धर्माचे मूळ आहे. जगातले सर्व धर्म सनातन धर्माशी सुसंगत आहेत. हिंदुत्व ही विचारधारा आहे, जीवनशैली आहे. संमेलनाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी) रामजन्मभूमीच्या कार्यासाठी योग्य वेळ संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असताना, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले की, धर्मसत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी राजसत्ता सहभागी झाली आहे. धर्मसत्तेच्या प्रसारासाठी हे महत्त्वाचे आहे. हीच वेळ रामजन्मभूमीच्या कार्याची खरी वेळ आहे. याचा लाभ घ्यावा, ही वेळ सोडू नका, असी सूचना शंकराचार्यांनी व्यासपीठावरील राजकारण्यांना केली.
प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल
By admin | Updated: December 24, 2016 02:55 IST