रामटेक : स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), रामटेक तालुक्याच्या वतीने विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद, संवाद, चर्चा आयोजित करावयाची असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणारा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी संघटेनेच्या वतीने रामटेकच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. सरकारचा हा निर्णय विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गदा आणणारा आहे. एवढेच नव्हे तर शासनाचा हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या ‘शिक्षणाचे वैश्वीकरण’ या विचाराशी विसंगत आहे, असेही एसएफआयने निवेदनात म्हटले आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाला चालना मिळाली. विद्यार्थ्यांना सहज आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापकांचा वर्ग (क्लासेस), चर्चा, संवाददेखील करता आली. वेगवेगळ्या मुद्यावर विद्यार्थीही अभिवक्त झाले. विद्यार्थ्यांना विचार मुक्तपणे मांडता आले. पण आता आलेला हा नवीन निर्णय ऑनलाईन परिषद किंवा तशा कार्यक्रमापासूनही विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा आणि विद्यापीठाची मुस्कटदाबी करणारा आहे. तेव्हा हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघर्ष हटवार, सूरज डुंडे, प्रीतम वासनिक, अमित हटवार यांचा समावेश होता.
सरकारने ‘तो’ निर्णय मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST