डॉ. सुश्रुत सुधीर बाभुळकर
जपानमध्ये सिमरिंग योकू ही पद्धत प्रचलित आहे. ही पद्धत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनाचा आनंद घेण्याचा आणि निरोगी जीवन जगण्याचा मार्ग आहे. हीच पद्धत भारतीयांनीही अवलंबावी. औषध आणि डॉक्टरांवर अवलंबून राहण्याऐवजी लोकांनी जगण्यासाठी स्वत:च नियम बनवावे. आजार टाळण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावे. निरोगी आयुष्यासाठी लोकांनी या जीवनशैलीचा अवलंब करावा, असा सल्ला नागपुरातील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक विशेषज्ज्ञ आणि डॉ. सुुश्रुत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रमुख डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी दिला.
लोकांना नवी आशा, नवी दिशा देण्याचे काम डॉक्टरच करतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शालेय शिक्षण ते डॉक्टरकीच्या प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यावर कशी मात केली, हे सोदाहरण त्यांनी सांगितले. ते म्हणाले, वर्धापासून सेवाग्राम रोडवर भानखेडा हे जन्मगाव. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण रामदासपेठेतील सोमलवार शाळेत झाले. घर शाळेलगत असल्याने शिक्षक आणि वडिलांना माझ्यावर लक्ष ठेवणे सोपे झाले. मी आठवीपर्यंत अभ्यासात हुशार नव्हतो. लहानपणी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, पतंग, विटीदांडू, भोवरे, कंचे आदी मैदानी खेळावर जास्त लक्ष असायचे. मित्रही याच भागातील होते. त्यांच्यासोबत लोकमत ते बजाजनगरपर्यंत पतंगाची पेच लढवायचो. तेव्हा या सर्वच खेळांमध्ये निपुण होतो. त्या खेळातील कलाकुसर आता वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात येत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान स्कीन स्टीच वेगात करता येते. दहावीत ओपन मेरिट आलो. बारावीत पीसीबी ग्रुपमध्ये बोर्डात प्रथम आणि संस्कृतमध्ये गोल्ड मेडल मिळाले. आई डॉ. अरुणा मातृसेवा संघाच्या अध्यक्षा आणि वडील डॉ. सुधीर ऑर्थोपेडिक सर्जन असल्याने वैद्यकीय क्षेत्राकडे आधीपासूनच कल होता. इंदिरा गांधी महाविद्यालय व रुग्णालयापासून सुरू झालेला वैद्यकीय प्रवास आतापर्यंत अविरत सुरू आहे. १९९२ मध्ये ऑर्थाेपेडिक सर्जन झालो. पहिली मॉडर्न हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी वडिलांनी केली. मलाही नवीन काहीतरी करायचे होते. जानेवारी १९९३ मध्ये इंग्लंडला गेलो. पहिला जॉब सुरू झाला. माझे कामाप्रति समर्पण पाहून एका रुग्णाने माझ्यावर हृदयस्पर्शी कविता लिहिली. ही कविता सर्व स्टॉफसमोर वाचून माझा सत्कार करण्यात आला. १९९४ मध्ये एमसीएच केले. लहान वयात एमसीएच करणारा मी जगात एकमेव आहे. १९९५ मध्ये अमेरिकेत जाऊन हॅण्ड ॲण्ड अप्पर लिम्ब यावर फेलोशिप केली. त्यावेळी विविध परिषदांमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्त्व करायचो. अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झाले. एचसीएच करण्याचा काळ कठीणच होता. मनात जिद्द होती. एमसीएचकरिता प्रोफेसरच्या विनवण्या केल्या. कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सात दिवस कारमध्येच काढले होते. त्यानंतर जर्मनीत गेलो. मर्सिडीज कंपनीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम केले. त्यामुळे मर्सिडीजचा प्रभाव माझ्यावर आहे. विदेशात स्थायिक न होता, देशप्रेमामुळे १९९८ मध्ये भारतात परत आलो. त्यावेळी ३२५ जणांपैकी परत येणारे केवळ १० ते १२ जणच होते. विदेशात स्थायिक झालो असतो तर जगाला काही नवीन व वेगळे देऊ शकलो असतो.
पूर्वीपासूनच संशोधक आहे. उपचार पद्धती अद्ययावत करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि ते नागपूरकरांना उपलब्ध झाले. हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नागपुरात पहिल्यांदा आणली. हाडे ठिसूळ झाल्यानंतर अनेकदा कंबरेचे हाड मोडते. त्याकरिता ही सर्जरी महत्त्वाची आहे. हॉस्पिटलमध्ये अद्ययावत स्पेस थिएटर सुरू केले. स्पेस सूट घालून शस्त्रक्रिया करण्यात येतात. अशावेळी ओटीमध्ये अद्ययावत उपकरणे असतात. विदर्भ ऑर्थाेपेडिक सोसायटीचा अध्यक्ष, ट्रामा सोसायटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आणि इंटरनॅशनल ऑर्थाेपेडिक ट्रामा असोसिएशनमध्ये (आयओटीए) भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे.
सामाजिक कार्य करताना गेल्या आठ वर्षांत १८०० अपंग मुलांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया केल्या आहेत. मातृसेवा संघ आणि जिल्हा परिषदेतर्फे विदर्भातील आजूबाजूच्या खेड्यात जाऊन अपंगत्त्वामुळे शाळा सोडलेल्या मुलांचा शोध घेण्यात येतो. त्यातील अपंग मुलांवर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येते. ही मुले हॉस्पिटलमध्ये आठ दिवस आणि मातृसेवा संघात एक वर्ष नि:शुल्क राहतात. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, हा उद्देश आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोना रुग्णांवर नागपुरात सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. तेव्हा व्हॅक्सीन नव्हते. २२ रुग्ण वेटिंगवर, केवळ ५ व्हेंटिलेटर, औषध व ऑक्सिजन नव्हते आणि नागरिकही चिडले होते. डॉक्टर चिंतेत होते. मॅनपॉवर नव्हता. अशाही काळात कोरोना रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार केले. डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी उपचार करतात, पण लोकांनी डॉक्टरांना समजून घ्यावे. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये.
पर्यावरणाशी जुळवून घेताना मध्य प्रदेशातील तामिया घाटातील पाताळकोट येथील १३ गावातील भारिया जमातीच्या आदिवासींवर उपचार केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले व उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले. हे आदिवासी झाडे तोडण्याऐवजी झाडे लावत आहेत. दहा वर्षांत १० हजार झाले लावली आहेत. पर्यावरणपूरक उपक्रमाचा प्रभाव मध्य भारतात दिसून येणार आहे. मला फिरायला आवडते. तामिया येथे रिसोर्ट बांधले आहे. पत्नी डॉ. नंदिनी आणि डॉ. संस्कृती व सिद्धी या दोन मुली आहेत. डॉ. संस्कृती इंग्लंडला शिक्षण घेत आहे.
वैद्यकीय व्यवसाय हे माझे कर्म असायला हवे, असे माझे मन मला बजावते, ते माझ्यावरील संस्कारामुळेच, असे डॉ. सुश्रुत बाभुळकरांचे मत आहे.