पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष : कंत्राटदाराला अभय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. यासाठी प्रभागाचे नगरसेवक व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनेही केली; परंतु सौंदर्यीकरण तर दूरच, तलावाच्या बाजूला असलेल्या भाजप ग्रामीण कार्यालय ते खादी ग्रामोद्योग दरम्यानच्या फूटपाथवरील गट्टू निघाले आहेत. यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक व तलावातील मासोळ्यांना खाद्य टाकण्यासाठी येणाऱ्यांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे मनपातील वजनदार नेत्यांचा हा प्रभाग आहे. नागरिकांनी गट्टू लावण्याच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, कंत्राटदाराला राजकीय नेत्यांचे अभय असल्याने तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम होत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तलाव सौंदर्यीकरणाचा सर्वे करण्यासाठी मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे पथक अनेकदा या परिसरात फिरले. मात्र, उखडलेले गट्टू दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधितांना दिले नाही. मनपातील अधिकारी संबंधित कंत्राटदाराच्या दबावात असल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
....
तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणावर अनेकदा निधी खर्च करण्यात आला; परंतु अजूनही तलावाची भिंत जागोजागी नादुरुस्त आहे. तलावाच्या काठावर विक्रेते बसतात. कचरा तलावात टाकला जातो. खाऊ गल्ली प्रकल्पावर ७२ लाख खर्च करण्यात आले; परंतु अद्याप हा प्रकल्प सुरू झाला नाही. उभारलेले डोम फाटत असल्याने हा निधी पाण्यात गेला आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
हुतात्मा स्मारकांकडे दुर्लक्ष
हुतात्मा स्मारकाच्या बांधकामावर १०लाख खर्च करण्यात आले; परंतु फरशा उखडल्या आहेत. चाचा नेहरू बालोद्यानात लहान मुलांची खेळणी नाहीत. जिम नादुरुस्त आहेत. वॉकिंग ट्रॅक नादुरुस्त झाले आहेत. यावरून नागरिकांना चालता येत नाही. याची मनपाने दुरुस्ती करावी, अशी मागणी राजेश कुंभलकर यांनी केली आहे. अशीच अवस्था पागे उद्यानाची आहे. येथील जिम नादुरुस्त असून साफसफाई होत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
...
असामाजिक तत्त्वाचा वावर
पागे उद्यान व चाचा नेहरू उद्यानात रात्रीच्या सुमारास असामाजिक तत्त्वाचा वावर असतो. दिवे बंद असल्याने रात्रीला अंधारात प्रेमीयुगुल जागोजागी बसून असतात. गणेशपेठ पोलिसांना लेखी तक्रार दिली, गस्तीची मागणी केली आहे; परंतु याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.