नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.
या उद्यानात केवळ २० टक्केच भागाचे उद्घाटन होत आहे. या उद्यानात आणखी सफारी, नाइट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत. भविष्यात येथे आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे ‘गोंडवाना थीम पार्क’ करण्याचे नियोजन केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी वादाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमी व वन्यजीवप्रेमी होते. एवढेच नव्हेतर सर्व ठाकरे कुटुंबीय हे पर्यावरणप्रेमी व आदिवासी समाजाचे हितच पाहणारे आहेत. मागील दहा वर्षांपासून हे पार्क बनविण्याच्या केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही.
...तर तेव्हाच नाव का दिले नाही
गोंडवाना नाव देण्याचा कुठेही प्रस्ताव शासनाकडे कधीच नव्हता, असेही राठोड यांनी म्हटले आहे. असा प्रस्ताव होता तर तेव्हाच नाव का दिले नाही, याचे उत्तर विरोधकांना देता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध करण्याची हिंमत नसल्याने आदिवासी समाजाचा वापर करून अप्रत्यक्ष विरोध करू नका, असे आवाहनही वनमंत्री राठोड यांनी केले आहे.
...