उत्तराखंड दुर्घटना : बेपत्ता यात्रेकरुंच्या कुटुंबीयांना मदतनागपूर: गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयात बेपत्ता झालेल्या ३७ नागपूरकर यात्रेकरूंच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी ५.५० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. राज्यात जलद गतीने मदत वाटप करणाऱ्या जिल्ह्यांपैकी नागपूर हा एक जिल्हा आहे.विशेष म्हणजे ही मदत प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला तारेवरची कसरतच करावी लागली. यात्रेकरूंची नावे शोधण्यापासून त्यांच्या नातेवार्इंकांशी संपर्क साधण्यापर्यंत आणि मदतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत यंत्रणेने बरीच मेहनत घेतली. त्यामुळेच बेपत्ता झालेल्या व नंतर मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या ३७ यात्रेकरूंच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून २ लाख तर केंद्र शासनाकडून ३.५० लाख असे प्रत्येकी ५.५० लाख रुपये वाटप करण्यात प्रशासनाला यश आले.नागपूरहून एकूण ११८ यात्रेकरू उत्तराखंडमध्ये गेले होते. या यात्रेकरूंची माहिती प्रशासनाकडे नव्हती. तेथे जलप्रलय आल्यावर ही माहिती गोळा करण्यात आली. यापैकी ३७ यात्रेकरू शेवटपर्यंत परत आले नाही. सहा महिन्यापेक्षा अधिक काळ वाट बघितल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले व मदत वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सर्वप्रथम राज्य शासनाकडून प्राप्त मदत देण्यात आली व त्यानंतर केंद्राच्या मदतीचे वाटप करण्यात आले.बेपत्ता यात्रेकरूंच्या शोधासाठी नागपुरातून एक विशेष पथकही पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले होते. उत्तराखंडमध्ये गेलेल्या यात्रेकरूंच्या अनेक नातेवार्इंकांनी स्वत: या कक्षात येऊन माहिती दिली.रोज या कक्षाशी ते संपर्कात राहात होते. या माहितीच्या आधारावर रोज उत्तराखंड सरकारसोबत संपर्क साधण्यात येत होता. विभागीय आणि जिल्हा पातळीवर रोज आढावा बैठकी घेऊन बेपत्ता यात्रेकरूंबाबतची माहिती मंत्रालयाला तसेच दिल्लीलाही कळविण्यात येत होती. (प्रतिनिधी)
मदतीसाठी करावा लागला पाठपुरावा
By admin | Updated: June 17, 2014 00:55 IST