वसीम कुरैशी
नागपूर : अनलॉकनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ ते २७ विमानांची उड्डाणे होत आहेत. लॉकडाऊनपूर्वीसारखी घरगुती उड्डाणांच्या स्थितीकरिता ३० पेक्षा जास्त उड्डाणांचे प्रस्थान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता समर शेड्युलमध्ये ही उड्डाणे वाढण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नागरी उड्डयण संचालनालयाच्या (डीजीसीए) नवी दिल्ली येथील मुख्यालयात शेड्युलसंदर्भात बैठक होणार आहे. समर शेड्युलबाबत विभिन्न विमान कंपन्या नवीन मार्गावर फेऱ्या वाढविण्यावर प्रस्ताव सादर करतील. यामध्ये नागपूर विमानतळावरून एक विमान कंपनी तीन ते चार उड्डाणे सुरू करण्याची शक्यता आहे.
मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) अधिकारी सूत्रांनी सांगितले की, अनेक दिवसापासून बंद असलेली जेट एअरवेजची उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. जेटच्या टीमने यासंदर्भात नागपूर विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे. याशिवाय एअर इंडियाचे सायंकाळचे मुंबई उड्डाण मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. जेट व एअर इंडियाच्या या दोन उड्डाणांव्यतिरिक्त जर समर शेड्युलमध्ये अपेक्षानुसार चार अतिरिक्त उड्डाणांचा समावेश होत असेल तर एकूण सहा नवीन उड्डाणे सहभागी होतील. यासह ३२ ते ३३ विमानांचे प्रस्थान होईल.
परंतु नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सध्या बंद आहेत. ही उड्डाणे पुढील काही दिवसात सुरू होण्याचे काहीही संकेत नाहीत. कतार व शारजाहला जाणारे निरंतर सोशल मीडियावर उड्डाणाची मागणी करीत आहेत.