प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरल्यास कारवाई : ध्वज सन्मान मोहीमनागपूर: राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, शिक्षण संस्थांना या संदर्भातील सर्व नियम निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार २६ जानेवारी,१५ आॅगस्ट किंवा इतर राष्ट्रीय उत्सवादरम्यान प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांनाही याची अंमलबजावणी करायची आहे.राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी प्लास्टिक झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जातात. यामुळे ध्वजाचा अपमान तर होतोच शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक राष्ट्रध्वज बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थानीही विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमानंतर प्रांगणात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले कागदी किंवा प्लास्टिकचे ध्वज उचलण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वज वापरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि तालुकापातळीवर समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीचे स्वत: जिल्हाधिकारी अध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव आहेत. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार अध्यक्ष,खंडविकास अधिकारी सचिव आणि ठाणेदार, सा.बा. विभागाचे उपअभियंता, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका अधीक्षक (भूमी अभिलेख) समितीचे सदस्य आहेत.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कागदी तसेच प्लास्टिक राष्ट्रध्वज निर्मितीस व वितरणावर पायबंद घालण्यासाठी वितरण आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनीही ते खरेदी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान रस्त्यावर पडलेले कागदी किवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे आणि गोळा केलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयाकडे सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ध्वज उंच धरा रे...
By admin | Updated: January 26, 2015 01:00 IST