समस्या सोडविण्याचे आश्वासन : मानसिंगदेव अभयारण्यामुळे शेती व तलाव अधिग्रहित
पवनी : नजीकच्या चोरबाहुली वन परिक्षेत्रातील शेती व तलाव मानसिंगदेव अभियारण्यातंर्गत येत असल्याने अधिग्रहित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील मच्छिमारांसमोर उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील मच्छिमारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी चोरबाहुली येथील मानसिंगदेव अभयारण्याच्या गेटसमोर सोमवारी दुपारी आंदोलन केले. हा परिसर आदिवासीबहुल आहे. येथे उपजीविकेचे प्रभावी साधन नसल्याने कोळी बांधव परिसरातील तलावांमध्ये मासेमारी करतात. सदर तलाव व शेती अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मासेमारीसह सिंचनाचीही समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी दुपारी चोरबाहुली येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डी. मल्लिकार्जुन रेड्डी, अॅड. आनंद गजभिये, छगन काठोते, सुंदरलाल ताकोद, कृष्णा नागपुरे, संजय मोरेशिया, पांडुरंग तिवाडे, सेवक नागपुरे, अशोक डहारे, सुरेश नागपुरे, लालमन कंगाली, भगवान भागडकर, घनश्याम मानकर यांच्यासह परिसरातील मच्छिमार सहभागी झाले होते. परिसरातील बोरडा, सराखा, कांद्री, देवळी या गावांसह ७५ चौरस कि.मी.च्या परिसराचा समावेश अभयारण्याच्या बफर झोनमध्ये करण्यात आला आहे. येथे सिंचन विभागाचा मोठा तलाव असून, त्याची सिंचन क्षमता २५० हेक्टरची आहे. हा तलाव मत्स्य उद्योग महामंडळाने सिंचन विभागाकडून मासेमारीसाठी लिजवर घेतला आहे. पुढे हा तलाव मासेमारी करण्यासाठी महामंडळाने स्थानिक जलकृषक मागासवर्गीय सहकारी संस्था व जयसेवा आदिवासी मच्छिमार सहकारी संस्थेला लिजवर दिला. यासाठी महामंडळाने या संस्थांकडून शुल्कही घेतले आहे. काही दिवसांपासून या तलावामध्ये मासेमारी करण्यास वन अधिकार्यांनी प्रतिबंध घातला. येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या तलावावर वन विभागाचा मालकी हक्क नाही. शिवाय, संबंधित विभागाने हा तलाव वन विभागाला हस्तांतरित केला नाही. त्यामुळे वन विभागाने घातलेला प्रतिबंध हा बेकायदेशीर असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, वन परिक्षेत्राधिकारी एम. जी. पोकळे, सहायक वन संरक्षक काळे व तारसेकर यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. या संदर्भात वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महसूल व सिचंन विभागाच्या अधिकार्यांशी गुरुवारी चर्चा करून मार्ग काढण्याचे या अधिकार्यांनी आश्वासन दिले. (वार्ताहर) मानसिंगदेव अभयारण्याच्या गेटसमोर मच्छिमारांनी असा ठिय्या मांडला होता.