नागपूर : नागपुरातून प्रवासी घेऊन सिवनी बसस्थानकावर पोहोचल्यानंतर जबलपूरला रवाना झालेल्या नंदन ट्रॅव्हल्सची बस मुख्यालयापासून १८ किलोमीटर दूर राहीवाडा गाव येथे दुपारी २.१५ वाजता पोहोचताच या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्यामुळे प्रवासी घाबरले. बसच्या चालक आणि वाहकाने तातडीने बसमधील ४० ते ५० प्रवाशांना सुखरूप बसच्या बाहेर काढून त्यांना दुसऱ्या बसने पाठविले. बस क्रमांक एम. पी. ४१, पी-०९१० मध्ये आग लागल्याचे पाहून तेथील गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना दिली. बसवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळानंतर आग विझली. परंतु काही वेळाने आग पुन्हा वाढली. पाहता पाहता आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. प्राथमिक तपासात बसच्या मागील टायरला लागून असलेल्या ड्रम प्लेट आणि ब्रेक शूचे घर्षण झाल्यामुळे बसमध्ये आग लागल्याची माहिती आहे. बंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
धावत्या गाडीला आग, अनर्थ टळला
By admin | Updated: December 22, 2016 20:33 IST