‘आप’चा मोर्चा : मेयो रुग्णालयात उपचार सुरू, शेतकरी वर्धा जिल्ह्यातील शिरपूरचानागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वर्धा जिल्ह्यातील पुंडलिक बालाजी ठाकरे या शेतक ऱ्याने मोर्चा स्थळावर किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याला ताबडतोब मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती आहे. शेतीला पाणी देऊ शकत नसल्याच्या विवंचनेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सामोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेला पुंडलिक बालाजी ठाकरे (६०) यांची वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील शिरपूर येथे दोन एकर शेती आहे. विकसनशील शेतकरी म्हणून ते गावात प्रसिद्ध आहे. शेतात त्यांनी शेततळे तयार करून, त्यात ते मासेपालनही करीत होते. सद्या त्यांनी शेतीत भाजीपाला लावला आहे. शेततळ्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी बोअर खोदली होती. पाण्याची सोय झाल्यामुळे त्यांनी महावितरणकडे विजेसाठी अर्ज केला होता. अनेक खटापटीनंतर शेतात वीज पोहचली. परंतु काही दिवसांपूर्वी शेतातील विजेचा खांब कोसळल्याने, वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडे तक्रारी करूनही वीज पुरवठा सुरू झाला नाही. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना, वीज नसल्यामुळे पाणी देऊ शकत नसल्याने ते त्रस्त होते. दुसरीकडे शेततळ्यातील मासे मृत पावत होते. महावितरणच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा दखल घेण्यात आली नाही. कर्जबाजारी होऊन शेती केल्यानंतरही केवळ पाण्याअभावी नुकसान होत असल्यामुळे ते अस्वस्थ झाले. घरी नागपूरला जात असल्याचे सांगून, दोन दिवसापूर्वी ते नागपुरात आले. मंगळवारी ते ‘आप’ च्या मोर्चात सहभागी झाले. मोर्चा श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स पॉर्इंटवर आल्यानंतर, आपच्या पदाधिकाऱ्यांचे भाषण सुरू होते. अशातच कस्तूरचंद पार्कच्या भिंतीजवळ एक माणूस पडल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसासह आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी आॅर्गनिक फास्फोरस पिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा शेतकरी आपचा समर्थक असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: December 16, 2015 03:27 IST