जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : भाजीपाला फेकला, दूध ओतले, राम नेवले, अरुण केदार, नंदा परातेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेत आपला भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवित आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधी नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. यानंतर राम नेवले यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होत असल्याच्या घटनेचा निषेध नोंदवित हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात राम नेवले, अरुण केदार, अॅड. नंदा पराते आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. अन् पोलिसांची उडाली तारांबळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांनी चांगलीच धसकी घेतली आहे. नागपुरात या आंदोलनाची फार तीव्रता नसली तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. दुपारी २ वाजता कार्यकर्ते एकत्र आले. निदर्शने सुरू असतानाच एक कार्यकर्ता भिंतीवरून उडी घेऊन दुधाच्या कॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत सुटला, पोलीसही त्याच्या मागे धावले व त्याला पकडले. पोलिसांनी पकडल्यावरही त्याने कॅनमधील दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले आणि शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजीपाला उचलून पोलिसांनीच केला रस्ता स्वच्छ आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर भाजीपाला, कांदे, मिरची, कोबी आदी टाकून आपला निषेध व्यक्त केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपल्यासोबत नेले. त्यानंतर भाजीपाला तसाच रस्त्यावर पडून होता. तेव्हा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीच पोत्यामध्ये हा कचरा भरला व रस्ता स्वच्छ केला. आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या पाठिशी भारतातील शेती आणि शेतकरी सरकारी धोरणांमुळे गंभीर संकटात आले आहेत. गेली अनेक वर्षे त्यावर नुसतीच चर्चा होत आहे. कर्जमाफी हा जरी कायमस्वरूपी उपाय नसला तरी आत्यहत्या त्वरित थांबवायच्या असतील तर कर्जमाफी शिवाय पर्याय नाही, हे सरकारने समजून घ्यावे, असे आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी स्पष्ट करीत शेतकऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. आजची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढावा. जर सरकार सकारात्मक दिसत नसेल तर कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला भाव देण्यासाठी ठराव आणून सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पार्टीने एकत्रित येऊन ठराव पारित करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनाची धग नागपुरातही
By admin | Updated: June 3, 2017 01:41 IST