नागपूर : कोरोनाच्या सवाटात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षेस आज सोमवारपासून सुरुवात झाली. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकित्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सुमारे ११ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. राज्यातील विविध १६५ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर ‘सोडियम हायपोक्लोराईड सोल्यूशन’चा व ‘लिक्विड सॅनिटायझर’चा वापर केला जात आहे. यासाठी विद्यापीठाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रास रुपये २० हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात येणार असून, प्रत्येक परीक्षा खोलीत कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाचा खंड देण्यात आला आहे. लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात मेडिकल, दंत महाविद्यालय, पांडव कॉलेज, शासकीय आयुर्वेद कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर आज शांततेत परीक्षेला सुरुवात झाली.
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी, शिक्षक व संबंधित कर्मचारी यांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परीक्षा २६ मार्च २०२१ पर्यंत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. अंतिम वषार्ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदर विद्यार्थी त्यांच्या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये ‘कोविड-१९’ रुग्ण सेवेकरिता उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेत वैद्यकीय विद्याशाखेचे ५,२४७, दंत विद्याशाखेचे ७४७, आयुर्वेद विद्याशाखेचे ५६३, होमिओपॅथी विद्याशाखेचे ३,०३४, युनानी विद्याशाखेचे ४० व तत्सम विद्याशाखेचे १३६४ विद्याथी परीक्षा देत आहेत.