नागपूर: जिल्हा प्रशासन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन मतदारसंघातील निवडणुकीचे शिवधनुष्य यशस्वी पेलल्यानंतर प्रशासनाला थोडी उसंत घेण्याचीही सवड मिळाली नाही तोच ही यंत्रणा पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीत व्यस्त असणार आहे. ३० मे ते १ जून या तीन दिवसात दररोज एमपीएससीच्या परीक्षा आहेत. राज्य किंवा देशपातळीवरील संस्थांकडून स्पर्धा परीक्षा घेतल्या जात असल्या तरी त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनावर असते. केंद्र मिळवून देणे, त्यावर मनुष्यबळाची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका आणण्यापासून तर त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यापर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर त्याचे नियोजितस्थळी पाठवण्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील परीक्षा विभाग काम करीत असतो. वर वर हे सहज वाटणारे काम असले तरी प्रचंड जबाबदारीचे आहे हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी) २५ मे -२५ मे रोजी नागपुरात स्टफ सिलेक्शनची परीक्षा आहे. यासाठी प्रशासनाला २२ केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करायची आहे. सकाळी आणि दुपारी अशा दोन टप्पयात ही परीक्षा होणार असून त्यास दहा हजारावर परीक्षार्थी बसण्याचा अंदाज आहे. ३० मे - ३० मे रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी नागपूर हे केंद्र आहे. यासाठी २० ते २५ केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करायची असून या परीक्षेला ६००-७०० विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. ३१ मे - या दिवशी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असून त्यासाठी नागपुरात केंद्रांची व्यवस्था करायची आहे. याही परीक्षेला सरासरी ६०० ते ७०० विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. १ जून - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्या परीक्षेचा तिसरा पेपर या १ जून रोजी आहे. त्यासाठी केंद्र व मनुष्यबळाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करायची आहे. ७ जून - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, या परीक्षेलाही तीन हजारावर परीक्षार्थी बसण्याची शक्यता आहे. किती केंद्राची गरज भासणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही.
परीक्षा प्रशासनाचीच !
By admin | Updated: May 21, 2014 01:12 IST