विधानसभा क्षेत्रात आंदोलन : तहसील कार्यालयावर मोर्चे नागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकर्यांना मिळाले नाही.गारपिटीचा केवळ ५0 टक्केच निधी वाटप झाला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकर्यांच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. ३१ मे रोजी दुपारी १ वाजता सावनेर, मौदा, उमरेड, नरखेड व रामटेक या तहसील कार्यालयावर भाजपाचा मोर्चा धडकणार आहे, तर २ मे रोजी हिंगणा तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपाचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आपापल्या भागात मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत शासनाने नागपूर जिल्ह्यासाठी ९00 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. यातील १५0 कोटीचे कर्ज जिल्हा बँकेतून व ७५0 कोटींचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून वाटप होणार आहे. मात्र, जिल्हा बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे बँक डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्जवाटप शक्य नाही. राष्ट्रीयीकृत बँकेत कर्जवाटपाची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे यंदा शेतकर्याला सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी मोठय़ा प्रमाणात बियाणे व खतांची कमतरता आहे. त्यामुळे बोगस बियाणे मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देऊन पुरेसे व अधिकृत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, शेतकर्यांना नुकसान भरपाईचे पैसे तातडीने द्यावे आणि शेतकर्यांचा कर्जपुरवठय़ाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी भाजपाची आहे. या पत्रपरिषदेला माजी आ. अशोक मानकर, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक धोटे, अरविंद गजभिये, प्रतिभा मांडवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकर्यांसाठी भाजपाचा सरकारविरुद्ध एल्गार
By admin | Updated: May 30, 2014 01:06 IST