नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघात प्रकरणात मृताच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
मृताचे नाव मनोज रंगारी होते. तो २६ मार्च २०१६ रोजी रेल्वेने गोंदिया ते नागपूर असा प्रवास करीत होता. त्याने या प्रवासाचे तिकीट खरेदी केले होते. कामठीजवळ धक्का लागल्यामुळे तो रेल्वेतून खाली पडून मरण पावला. त्यामुळे मनोजची पत्नी व इतर वारसदारांनी नियमानुसार आठ लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी सुरुवातीला रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. १७ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायाधिकरणने तो दावा नामंजूर केला. मनोज प्रामाणिक प्रवासी नव्हता, असे कारण दावा नाकारताना देण्यात आले. परिणामी, वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता, ते अपील मंजूर करून वारसदारांना दिलासा दिला. मनोजच्या खिशात सापडलेले रेल्वे तिकीट वैध होते. याशिवाय अन्य विविध पुराव्यांवरून मनोज प्रामाणिक प्रवासी होता, हे सिद्ध होते. परंतु, न्यायाधिकरणने विवादित निर्णय देताना त्याकडे दुर्लक्ष केले, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.