नागपूर : वीजनिर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रांना लागणारा कोळसा आयात केल्यानंतर रेल्वे मालगाडीतून तो वेळेवर रिकामा न केल्याबद्दल महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका दरवर्षी बसतो. महानिर्मितीच्या तिजोरीतून गेलेल्या या कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड अखेर सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो. यासंदर्भात महानिर्मितीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.महानिर्मितीने अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीवरू न केवळ तीनच वीजनिर्मिती केंद्रांचे डॅमरेज हे कोट्यवधीच्या घरात असल्याचे सिद्ध झाले आहे. वीजनिर्मिती केंद्रांसाठी लागणारा कोळसा निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वे मालगाडीने आणला जातो. प्रत्येक निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वेचे रुळ टाकण्यात आले आहेत. या केंद्रांना लागणारा हजारो टन कोळसा रेल्वेद्वारे पोहोचवला जातो. कोळशाने भरलेले रेल्वेचे पूर्ण डबे रिकामे करण्यासाठी रेल्वेने महानिर्मितीला सात तासांचा अवधी दिलेला असतो. एक १६ डब्याची रेल्वेगाडी सात तासात रिकामी करावी लागते. जर सात तासात गाडी रिकामी केली गेली नाही, तर प्रत्येक डब्याला प्रत्येक तासाला रेल्वे महानिर्मितीकडून दंड ‘डॅमरेज’ वसूल करते. म्हणजेच सात तासांपेक्षा जास्त अवधी झाल्यास प्रत्येक तासाला प्रत्येक डब्याला रेल्वे दंड लावते. महानिर्मितीने रेल्वेतून कोळसा रिकामा करण्याचे कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले आहे. ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल कोट्यवधींच्या घरात करण्यात येणाऱ्या या डॅमरेजच्या खर्चाची दखल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून हा खर्च कसा वाचेल, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांना सप्टेंबरमध्ये त्यांनी एक पत्र पाठवून विचारणा केली आहे. पण महानिर्मितीने त्यावर अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.
कोळशाच्या ‘डॅमरेज’मुळे महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका
By admin | Updated: November 17, 2015 04:23 IST