न्यायालय : समीर जोशीचे हमीपत्रनागपूर : गुंतवणूकदारांच्या ठेवी जामीन मंजूर झाल्यानंतर एका वर्षात परत करण्याचे हमीपत्र श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. जोशीने हे हमीपत्र आपले वकील अॅड. अशोक भांगडे यांच्यामार्फत दाखल केले आहे. सध्या समीर जोशी हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून, त्याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झालेली आहे. त्यावर आदेश होणे बाकी आहे. अमित मोरे यांच्या तक्रारीवरून १५ सप्टेंबर २०१३ रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन, १५ आॅक्टोबर रोजी समीर जोशी तर २९ आॅक्टोबर रोजी त्याची पत्नी आणि श्रीसूर्या समूहाची संचालिका पल्लवी जोशी हिला आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली होती. ठेवीवर त्रेमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून या दाम्पत्याने ५ हजार ९२ गुंतवणूकदारांची २४७ कोटी १४ लाख रुपयांनी फसवणूक केलेली आहे. तक्रारी केवळ ८०० ते ९०० लोकांच्या असून, फसवणुकीचा हा आकडा १०० कोटी आहे. १३ डिसेंबर २०१३ रोजी या दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले आहे. दाखल हमीपत्रानुसार समीर हा केवळ तक्रारकर्त्यांच्याच ठेवी परत करणार आहे. दरम्यान, पीडित गुंतवणूकदारांचे वकील अॅड. बी. एम. करडे हे समीर जोशी याच्या पेशीच्या पुढच्या तारखेच्या दिवशी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात अर्ज दाखल करून आरोपीचे ठेवी परतफेडीचे स्रोत काय, याबाबत विचारणा करणार आहे.न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. अशोक भांगडे तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
‘ठेवी परत करतो’
By admin | Updated: August 26, 2014 01:02 IST