नागपूर : सलून व्यवसाय हा वैयक्तिक स्वच्छतेशी आणि आरोग्याशी संबंधित आहे. यामुळे या व्यवसायाला अत्यावश्यक सेवा म्हणून गणले जावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन समाजाच्या शिष्टमंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून परिस्थिती कथन केली. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. एकता मंचचे संस्थापक-अध्यक्ष धनराज वलुकार, शहर अध्यक्ष अमोल आंबूलकर यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह चर्चा केली. या विषयावर सलून पार्लर व्यावसायिकांना दिलासा देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. या वेळी मुरलीधर गतफने, सल्लागार हरीराम चोपकर, शहर अध्यक्ष अमोल आंबूलकर, संतोष वैद्य, विक्की साबळे, राजू तळखंडे, संजय चांदेकर, राजेश ससनकर, रवी लंगे, यादवराव बोरकर, नागराज नागमोते, रितीक चौधरी आदी पदाधिकारी तसेच सलून व्यावसायिक उपस्थित होते.