पाक उच्चायुक्त अब्दुल बासित : शांती युद्धाने नव्हे तर चर्चेने शक्यनागपूर : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. जी व्यक्ती पाकिस्तानातच नाही, त्या व्यक्तीला भारताच्या स्वाधीन करणे किंवा न करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक पत्रकार भवन येथे शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. बासित यांनी सांगितले, पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, असाच आपला मुख्य प्रयत्न राहील. याबाबत आपण आशावादी आहोत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानात ‘कंट्री व्हिजा’ देण्याबाबतची अपेक्षा व्यक्त करीत दोन्ही देशांमध्ये शांतता ही युद्धामुळे येणार नसून ती सार्थक चर्चेनंतरच शक्य आहे. भारत जेव्हा योग्य समजेल तेव्हा चर्चेचे सत्र पुढे चालू शकेल. परंतु यात कुठलीही अट किंवा लिंकेजेस असू नयेत. येणाऱ्या पिढीला सुद्धा हेच हवे आहे की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध चांगले असावे. याला सार्थक करण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) क्रिकेट डिप्लोमसीने प्रश्न सुटणार नाही क्रिकेट डिप्लोमसीचे स्वत:चे एक वेगळे महत्त्व आहे. परंतु त्याच्या काही मर्यादाही आहेत. क्रिकेटमुळे दोन्ही देशातील प्रश्न सुटू शकणार नाही. यामुळे वातावरण चांगले होऊ शकते, परंतु ते फार काळ टिकून राहू शकत नाही. दहशतवादामुळे सर्वाधिक त्रास पाकिस्तानलाच सोसावा लागला आहे. आम्ही मागील ३५ वर्षांपासून दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील दोन वर्षात यशही मिळाले आहे. परंतु अजूनही खूप करायचे आहे. नागरिकही आता दहशतवादाच्या विरोधात उभे होत आहेत. अशा परिस्थितीत हळूहळू दहशतवाद मिटविण्यास यश मिळणे निश्चित आहे, असेही ते म्हणाले. हल्ल्याच्या वक्तव्यावर चर्चेची गरज नाहीरावळपिंडी येथून मिसाईलने दिल्लीवर पाच मिनिटात हल्ला करता येऊ शकतो, पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केलेल्या या वक्तव्यसंदर्भात पाक उच्चायुक्त बासित म्हणाले, डॉ. अब्दुल कादीर हे कुठल्याही शासकीय पदावर नाही. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज नाही.
दाऊद पाकिस्तानात नाहीच तर देणार कुठून?
By admin | Updated: June 5, 2016 02:51 IST