ग्रेट मराठा एन्टरटेन्मेन्टची निर्मिती : दमदार सादरीकरणाने हसवणूकनागपूर : आपल्याकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळी आहे, असे मानले जाते. मुळात व्यावसायिक रंगभूमी सकस असली तरी बरेचदा त्यात व्यवसायाच्या दृष्टीनेच जास्त विचार केला असतो. पण त्या तुलनेत प्रयोगिक रंगभूमीवर मात्र वेगवेगळे प्रयोग अधिक गांभीर्याने केले जातात. दुर्दैवाने राज्यातील कानाकोपऱ्यात होणारी चांगली प्रायोगिक नाटके अर्थकारणाअभावी राज्यभर पोहोचू शकत नाही पण स्थानिक पातळीवरील रसिकांकडून त्याची प्रशंसा होते. डॉ. विवेक बेळे प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळे फॉर्म घेऊन उतरणारे प्रतिभावंत लेखक. पण त्यांच्या अनेक नाटकांनी प्रायोगितकतेची सीमा ओलांडून उत्तम व्यवसायही केला आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे त्याचे पुनश्च उत्तम उदाहरण. जरा चावट पण चाळीशीतल्या रसिकांना ‘रिलेट’ करणारे आणि स्त्री-पुरुष संबंधातली गुंतागुंत मांडणारे हे नाट्य आज नागपूरकर रसिकांनी ‘एन्जॉय’ केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचा प्रयोग आज आयोजित करण्यात आला होता. आपल्या समाजात स्त्री-पुरुष सहसंबंधांबाबत फारसे बोलले जात नाही. त्याला आता प्रारंभ झाला असला तरी या नात्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘गॉसिपिंग’ करण्याचाच असतो. चाळीशीत आल्यावर कदाचित माणसांमधल्या अतृप्त इच्छा, कल्पना अधिक उसळी मारून वर येतात. कारण आयुष्यात स्थिरावण्यासाठी परिश्रम करताना तारुण्यात बरेच काही राहून जाते. स्वाभाविकपणे माणसावर झालेला संस्कार, सामाजिक नियमांची चौकट आणि प्रतिष्ठा यामुळे बरेचदा मनातल्या सुप्त इच्छांना तिलांजली द्यावी लागते कारण काही जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात. पण तरीही सुप्त इच्छा माणसाच्या मनात असतात. त्याला नैतिक म्हणावे की अनैतिक हा वादाचा मुद्दा असला तरी समाजात अनादी काळापासून विवाहबाह्य नाते तयार होते. हाच विषय नेमकेपणाने डॉ. विवेक बेळे यांनी मांडला आहे आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनी त्याला संपूर्ण न्याय दिला आहे हे नाटक पाहताना जाणवले. वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या जोड्या वरुण-शलाका, पराग-आदिती, डॉक्टर-सुमित्रा आणि त्यांचा अविवाहित मित्र अभिषेक. एकमेकांचे कौटुंबिक मित्र असलेले सात लोक विकएण्डला डॉक्टरच्या फॉर्महाऊसवर जातात. मौजमस्ती सुरू असताना लाईट जातात. अंधारात कुणीतरी कुणाला किस करतो. जिचा किस घेतला गेला ती त्याच्या कानाखाली आवाज करते. लाईट आल्यावर मात्र हे सारे कुणा दोघांत घडले, ते कळत नाही. ज्या दोघांत हे घडले तेही कबूल होत नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या बायकोवर आणि नवऱ्यावर संशय येतो. ही गुंतागुंत वाढते. एक ब्लॉग सुरू करण्यात येतो. त्यावर कुणा दोघांत हे घडले त्यांनी कबूल करावे वा कुणाला काही कळल्यास त्यावर लिहावे, असे आवाहन केले जाते. हा ब्लॉगही चांगलाच रंगतो. पण नेमके काय होते ते पाहण्यासाठी हे नाटकच बघायला हवे. यातील रहस्य अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यात वरुणच्या भूमिकेत आनंद इंगळे यांनी भन्नाट भूमिका केली आहे. याशिवाय सीमा देशमुख, राजन भिसे, मंजूषा गोडसे, धनंजय गोरे, विद्याधर जोशी आणि राधिका विद्यासागर यांच्या अभिनयाने नाटकात जान आणली आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य कल्पक आहे. (प्रतिनिधी)
चावट पण मार्मिक नाट्य - ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’
By admin | Updated: June 29, 2014 00:47 IST