लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - १२ ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व समन्वयाच्या अभावामुळे मुंबई अंधारात बुडाली होती. मात्र यासंदर्भात एका आयपीएस अधिकाऱ्याने सायबर अटॅक असल्याचे अहवालात दाखविणे हा आश्चर्यजनक प्रकार आहे. या प्रकरणात गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मंगळवारी नागपूर पत्रकार क्लब येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली जात आहे आणि वीजबिल माफीसंदर्भात जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत. अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्यासाठी असा अहवाल समोर आणण्यात आला आहे. एका आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारावर आयपीएस अधिकाऱ्याने हा अहवाल तयार केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला येणाऱ्या दोन वाहिन्या अगोदरच बंद पडल्या होत्या. त्यानंतर उर्वरित दोन वाहिन्यांवर भार आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाले. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा बंद केला. यात कुठल्याही पद्धतीचा घातपात नव्हता. अधिकाऱ्यांनी चूक केली व समन्वय ठेवला नाही, आता अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहेत. असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे बावनकुळे म्हणाले.
एमईआरसीने निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीनेदेखील घातपाताचा कुठेही उल्लेख केला नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.
सायबर अटॅक होईल इतकी सक्षम यंत्रणा नाही
चीनमधून सायबर अटॅक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातील वीज यंत्रणा सायबर अटॅक होईल या क्षमतेचीच नाही. अजूनही मॅन्युअली काम चालते, असा दावा बावनकुळे यांनी केला. जर एखाद्या देशाचे नाव अहवालात होते, तर राज्य शासनाने किंवा चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने केंद्रीय परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाला का कळविले नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.