नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रद्द केलेल्या रेल्वेगाड्या रुळावर आणणे सुरू केले आहे. प्रमुख रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. तर उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यात मात्र प्रवासी खचाखच भरलेले दिसत असून कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. हे वातावरण कोरोनासाठी पोषक असल्याचे मत रेल्वेतील जाणकार व्यक्त करीत आहेत.
मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन लावल्यानंतर देशाच्या विविध भागात राहणाऱ्या कामगारांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे ते आपापल्या मूळ गावी निघुन गेले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा पहिल्या लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा कामगारांना आपल्या गावाकडे निघून जावे लागले. परंतु आता पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही याची खात्री पटल्यामुळे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परत जात आहेत. उत्तर भारत, बंगाल आणि छत्तीसगड येथून मोठ्या संख्येने कामगार पुन्हा दक्षिण भारताकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात या कामगारांची गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीट बंद केले आहेत. प्रवासासाठी कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. जनरल कोचमध्ये प्रवास करण्यासाठीही आरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालकडून येत असलेल्या रेल्वेगाड्यांकडे पाहून कोरोना कधीच नव्हता असे वाटत आहे. दानापूर, गोरखपुर, पटना आणि लखनौकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील जनरल कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. १०२ सीट असलेल्या जनरल कोचमध्ये १५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे नागपूरवरून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. काही गाड्यात वेटिंग ५० आणि १०० पर्यंत पोहोचले आहे. पुन्हा सुरु झालेल्या मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुरांतोच्या स्लिपर क्लासमध्ये वेटिंग सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यात होणारी खचाखच गर्दी थांबविण्याची गरज आहे.
...................