भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर पेरलेले बियाणे गत गुरुवारच्या पावसात जमिनीत गडप झाले. प्रत्येक गावात दोन चार शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे तालुक्यात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
तालुक्यात ९ ते १० जूनपासून अनेकांनी पेरणीला सुरुवात केली. समाधानकारक पाऊस असल्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाणे शेतात अंकुरले आहे. मात्र त्यानंतर १७ जून रोजी तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १५ व १६ जून रोजी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीत खोलवर गडप झाले. जास्त पावसामुळे पेरलेल्या बियाणांवर शेतातील मातीचा थर बसला. त्यानंतर पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यातील जवळी, मालेवाडा, उखळी, चिचाळा, पाहमी, बोटेझरी, मांडवा, वासी, सोमनाळा, वाकेश्वर, भगवानपूर, सायगाव, सालेभट्टी, चारगाव, कवडसी (बरड) पांजरेपार, रोहना, चिखली आदी गावात काही शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्या आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी स्वत:ला धीर देत नुकसानग्रसस्त शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी चालविली आहे. अशात तालुक्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी सेवा केंद्राकडे सुध्दा आता बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी,असा प्रश्न विचारला जात आहे.
पावसाचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा
१७ जून रोजी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. जवळी, मालेवाडा, चिचाळा या पट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. यात जमिनीत गडप झालेल्या बियाणांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यानंतर हलका पाऊस महत्वाचा होता. मात्र तब्बल पाच दिवस पावसाने उसंत घेतली आणि दुबार पेरणीची संकट ओढवले. अशातच मंगळवारी राञभर चांगला पाऊस झाल्याने ऑक्सिजनवरील कोवळ्या अंकुरलेल्या बियाणांना जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
===Photopath===
230621\img-20210621-wa0085.jpg
===Caption===
१७ जूनच्या पावसामुळे जवळी येथील ह्या शेतात पेरलेले बियाणे जमिणीत गडप झाले आणि दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.