कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा : वर्षभरापासून १५ फूट खोल खड्डा बुजवलाच नाहीसुनील चरपे नागपूरशासकीय कामांमधील निष्काळजीपणा हा नवीन नाही. परंतु या निष्काळजीपणामुळे सामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागतो. एखाद्यावेळी जीवही गमवावा लागतो. असाच प्रकार हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) येथे घडला. येथील बंधाऱ्यासाठी नाल्याच्या पात्रात कंत्राटदाराने जेसीबीच्या मदतीने १५ फूट खोल खड्डा खोदला आणि त्यातील पाण्याचा वापर बांधकामासाठी केला. बंधाऱ्याचे बांधकाम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले. तरीही कंत्राटदाराने हा खड्डा बुजविला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. हा खड्डा सावंगीवासीयांसाठी जीवघेणा ठरला. या खड्ड्यात चार तरुणी, एक मुलगी आणि एक महिला अशा सहा जणींचा बुडून मृत्यू झाला.सावंगी (देवळी) शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर २०१५ मध्ये बंधारा बांधण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या बंधारा दुरुस्ती व खोलीकरण योजनेंतर्गत चार लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामाचे कंत्राट सावरकर नामक कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्याने सदर बंधाऱ्याचे काम मार्च ते मे २०१५ या काळात पूर्ण केले. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणण्याऐवजी कंत्राटदाराने नाल्याच्या पात्रात जेसीबीच्या मदतीने अंदाजे १५ फूट खोल खड्डा खोदला. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा खड्डा बुजविणे क्रमप्राप्त होते. परंतु, कंत्राटदाराने हा खड्डा बुजविला नाही. लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले.या खड्ड्यात पाणी साठून राहात असल्याने मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी खड्ड्यावर इलेक्ट्रिक मोटरपंप बसवून त्यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला होता.नागरिकांचा संताप नागपूर : बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आल्याने हा खड्डा पाण्याखाली आला होता. हा खड्डा बंधाऱ्याच्या टोकावर असल्याने गावातील तरुणींना याबाबत फारशी माहिती नव्हती. त्या आंघोळ करण्याच्या निमित्ताने बंधाऱ्यात उतरल्या आणि खोल खड्ड्याने त्यांचे प्राण घेतले. जि.प.च्या लघुसिंचन विभागांतर्गत या बंधाऱ्याचे काम झाले. सहा जणांचा बळी गेला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प. अध्यक्षांसह अनेक जणांनी भेटी दिल्या परंतु लघुसिंचन विभागातील अधिकारी मात्र आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यांनी पोलिसांना मृतदेह घेऊन जाण्यासही रोखले. (प्रतिनिधी)कंत्राटदार व अभियंत्यावर गुन्हा दाखल कराही घटना संबंधित कंत्राटदार आणि जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे घडली. या घटनेची माहिती लघुसिंचन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली असतानाही या विभागातील अधिकारी तर सोडा कर्मचारीदेखील घटनास्थळावर आले नाही. या घटनेला कंत्राटदार व लघुसिंचन विभागाचे अभियंता सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.कुंदा राऊत,माजी अध्यक्षा, युवक काँग्रेस, रामटेक लोकसभा.
खड्ड्याने घेतले जीव
By admin | Updated: September 5, 2016 02:14 IST