रामटेक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेअंतर्गत समतादूत प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत २ मार्चपासून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सप्ताह कार्यक्रम राबविला जात असून, अनुसूचित जाती तरुण व तरुणींचे युवा केंद्र निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत रामटेक तालुक्यातील नगरधन, हमलापुरी, चिचाळा, कवलापूर, हिवरा-हिवरी, भिलेवाडा, सोनेघाट या गावातील तरुण- तरुणींचे युवा केंद्रात नामांकन करण्यात आले. तरुणांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करून भविष्यकालीन विविध योजनांची माहिती व लाभ प्राप्त करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती रामटेक तालुक्याचे समतादूत राजेश राठोड यांनी दिली. यात संपूर्ण तालुक्यातील अनुसूचित जातींमधील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, लेखी परीक्षा, ऑनलाईन मार्गदर्शन तसेच विविध योजनांचे अभ्यासपूर्ण व योग्य मार्गदर्शन नि:शुल्क प्राप्त व्हावे म्हणून तालुकास्तरावर युवा केंद्र स्थापन करण्याचे काम लवकरच पूर्ण केले जात आहे. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने व्हाॅट्सॲप, यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून तरुणांना तज्ज्ञांमार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नगरधन येथील मिलिंद मेश्राम, रोहित शेंडे, रोशन गजभिये, शांतनु पाटील, स्नेहदीप वाघमारे, सुमित गणवीर, अंशुल पाटील, भारत तिरपुडे, प्रतीक पाटील, रणजित वाघमारे, सिद्धार्थ गजभिये, संदीप वाघमारे, भूपेंद्र गणवीर, भिलेवाडा येथील सिहाल भोवते, सचिन डोंगरे, रूपेश ढोके, धनंजय ढोके, गुलशन ढोके, स्वप्निल डोंगरे, विपुल ढोके, अक्षय डोंगरे, प्रशिक भोवते, प्रलय भोवते, प्रफुल्ल डोंगरे, सुमेश ढोके, अजय ढोके, प्रेमदास भोवते, देवमण ढोके, शिशुपाल ढोके, विकास भोवते, सिद्धार्थ ढोके, महेंद्र ढोके, जयपाल भोवते यांना जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी मार्गदर्शन केले.