पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : स्वातंत्र्यदिनाचा शानदार सोहळा नागपूर: शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाची जोड देऊन विकासाचा पल्ला गाठावयाचा आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या ६९ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त एस.पी.यादव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आमदार जोगेंद्र कवाडे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत शासनाने अनेक प्रगतिशील निर्णय घेऊन ग्रामीण व शहरी विकासाच्या योजना अंमलात आणल्या. उद्योगाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविली असेही त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील २००१ नंतरचे भूखंड नियमित होणार असून एक हजार चौरस फूटपर्यंत क्षेत्राचे व २००१ पूर्वी खरेदी झालेले प्लॉटचे गुंठेवारी कायद्यातंर्गत नासुप्रद्वारे नियमितीकरण करण्यात येणार आहे. नागपूर शहराच्या हद्दीबाहेर २५ किलोमीटरच्या परिसरात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन नागपूरच्या प्रस्तावित आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १० किलोमीटरपर्यंतचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलशिवार योजनेतंर्गत जिल्ह्यात ३१३ गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये मार्च २०१६ पर्यत ३८०६.६६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून २६३४ कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ मध्ये नव्याने १८५ गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी १३५७८.६० लाखाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. स्मार्ट शहराच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना मांडली. या संकल्पनेत मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठीतील खसाळा आणि तिरोडी हिंगणातील दाभा आणि नागपूर ग्रामीणमधील विहीरगाव या गावातील ग्रामपंचायतींच्या सर्व सेवा आॅनलाईन पध्दतीने होणार आहेत. जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायती डिजिटल ग्राम झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्याला देशातील पहिला डिजिटल जिल्हा होण्याचा मान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (सन २०१४-१५) शिष्यवृत्तीधारक अखिलेश विनय गणेशकर, कु. साक्षी अनिल पिंपळे, सिद्धार्थ शरद चांडक, मैत्रेयी मिलिंद यावलकर, श्रुतेश तापेश पाटील, समीर विवेक पांडे, अभिषेक संदीप तानपुरे, क्षितु बिपीन देवगडे, निकिता नवीन चांडक, हर्षीत संजय कोठारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल लाईन व पोलीस मुख्यालय कामठी रोड या दोन्ही जमिनीबाबत उपस्थित झालेला प्रश्न निकाली लावून विभागास सहकार्य केल्याबद्दल महेशकुमार एच. गोयल, सल्लागार यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना संजय सीताराम सहारे ( लिंगा, कळमेश्वर), संदीप शामराव किंदर्ले (पाचगांव, उमरेड) रवींद्र रंगराव नेवारे (खापरी, उमरेड) सतीश मारोतराव टेकाडे (गुमथळा, कामठी) मंगेश घनश्याम डाखरे (वडोदा, कामठी ) यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
नागपूरच्या विकासासह रोजगाराच्या संधी निर्माण करणार
By admin | Updated: August 17, 2016 02:15 IST