आराखडा तयार, लवकरच मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या राजकारणावर शुगर लॉबीच्या मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यात ऊसतोड करणारा मोठा वर्ग असून त्यांचे अनेक प्रश्नही आहेत. या ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार असून हे महामंडळ समाजकल्याण विभागांतर्गत राहणार आहे. याचा आराखडा तयार झाला असून लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. अनेक कारखाने या भागात आहेत. यातील बहतांशी साखर कारखाने हे सहकारी तत्त्वावर आहेत. उसाचे सर्वाधिक क्षेत्र याच भागात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात साखर कारखाने असून उसाचे क्षेत्र आहे. ऊस तोडणारा कामगार मोठ्या संख्येने आहे. साखर कारखान्याचे चक्र या कामगारांवर आहे. या कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची मागणी होती. आता सरकारकडून यासाठी महामंडळ तयार करण्यात येत आहे. यासाठी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष पुढकार घेतला. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गतच हे महामंडळ असणार आहे. या महामंडळाया आराखडाही तयार करण्यात आला आहे. महामंडळाचे काम कशाप्रकारे चालेल, कोणकोण यात असतील, योजना आदी बाबींचा यात समावेश राहणार आहे.
ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाला असून मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. यासाठी वेगळा कायदाही करण्यात येणार आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण