तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या गंभीर : दीप्ती ख्रिश्चन नागपूर : तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत. नकळत मुले अनोळख्यांशी जवळीक साधत आहे. कुटुंबाचा सहवास हरविल्याने मुले एकटी पडली आहेत. त्यामुळे समाजात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर मुलांना, विद्यार्थ्यांना समजून घेऊन, त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे मत हिस्लॉप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीप्ती ख्रिश्चन यांनी व्यक्त केले. जागतिक आत्महत्या परावृत्त दिनाच्या निमित्ताने श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे ‘शैक्षणिक सुधारणा आणि विद्यार्थ्यांमधील आत्महत्येची मानसिकता’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनाला मुख्य अतिथी म्हणून दीप्ती ख्रिश्चन उपस्थित होत्या. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गांधी, महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहल पाळधीकर, मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दीपा बलखंडे उपस्थित होते. चर्चासत्रात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी ‘आत्महत्या मानसिकतेची आंतरिक कारणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या विविध सामाजिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन सादर केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘आत्महत्येला रोखण्यासाठी समन्वयकाची भूमिका’ या विषयावर स्वाती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘मानसिक आरोग्य व जगण्याचे कौशल्य’ या विषयावर डॉ. नीलम देशमुख मार्गदर्शन करणार आहे. या चर्चासत्राला शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह अॅड. राजेंद्र राठी, मंडळाचे पदाधिकारी डॉ. सी. जी. पांडे, प्रा. साधना मूल, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमृता गोखले तर आभारप्रदर्शन प्रा. आरती बरगे यांनी केले. (प्रतिनिधी)
संपर्क वाढला, मात्र संवाद घटला
By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST