आज संविधान दिवस : सुशील मेश्राम रुजविताहेत संविधानाचे मूल्यनागपूर : रक्तदान करताना आपले रक्त कुठल्या धर्माच्या जातीच्या व्यक्तीला, श्रीमंताला मिळते की गरिबाला असे आपण विचारत नाही. कारण त्यावेळी आपली भावना मानवतावादाची असते. आपल्या रक्ताच्या थेंबाने कुणाचेतरी प्राण वाचतील, हा त्यामागचा एकमेव उद्देश असतो. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यातील रक्तदानामागची भावना ही बंधुता या मूल्यात येते. हे आपल्याला संविधान न वाचताही कळते. संविधानाने समाजाभिमुख जगण्याचे जे तत्त्वज्ञान शिकविले आहे, ते तत्त्वज्ञान प्रा. सुशील मेश्राम यांनी अंगिकारले असून, ते समाजात रुजविण्याचे कार्य ते करीत आहेत. आपण सर्वप्रथम समाजाचे, देशाचे नागरिक आहोत, ही भावना त्यांच्या कृतीतून व्यक्त होते. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. संविधानाने मानवतावादी दृष्टिकोन दिला आहे. विश्वाचे कल्याण संविधानात आहे. सुख, शांती, समाधान निर्माण करण्यासाठी समाजात संविधान संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संविधान दिवस हा एक दिवस साजरा करून होणार नाही. संविधान उत्सव साजरा करण्यासारखी घटना नाही. संविधान हे शिक्षित व अशिक्षिताने समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधान वाचण्याचीही गरज नाही. समाजासाठी, देशासाठी आपली काय जबाबदारी आहे, हे जेव्हा आपल्या कृतीतून उतरते, त्यालाच खऱ्या अर्थाने संविधान स्वीकारले असे म्हणावे लागेल. शिक्षकी पेशात असलेले सुशील मेश्राम हाच भाव समाजात पेरण्याचा प्रयत्न करतात. ते संविधानाची प्रास्ताविका वाचण्यास सांगत नाहीत किंवा संविधानाचे पुस्तक कुणाला भेट देत नाहीत. तर संविधानात जी मूल्ये आहेत, जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते छोट्याछोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहविण्याचे कार्य करतात. नेत्रदान, अवयवदान, देहदानाच्या मागची भूमिका समाजाला समजावून सांगतात. मरणोपरांतही आपल्या देहाचा समाजासाठी कसा उपयोग होईल यासाठी कार्य करतात. त्यांच्या प्रबोधनातून सेवादल महिला महाविद्यालयातील १५३ विद्यार्थिनींनी नेत्रदानाचा तर ६३ विद्यार्थिनींनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. दानाची ही भावना बंधुतेचे मूल्य आहे. (प्रतिनिधी) संविधानाची मूल्ये अभ्यासक्रमात यावीतमहाविद्यालयात त्यांनी युवती एल्गार संघाची स्थापना करून त्यांना रुढी परंपरेच्या बंधनातून मुक्त करून समतेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करतात. विवेकी जोडीदाराची निवड या उपक्रमातून जाती, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडताना सुसंवाद घडला पाहिजे, असा विवेकी जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळवून देतात. महापुरुषांच्या संतांच्या जयंती साजरी करताना त्यात सर्वप्रथम प्रास्ताविकेचे वाचन करून, त्यामागचा उद्देश लोकांना समजवितात. त्यांच्या प्रेरणेतून काही बौद्ध विहारामध्ये पंचशीलाचे वाचन न होता संविधानाची प्रास्ताविका वाचली जाते. समाजात वावरताना जातीविरहीत, धर्माविरहीत आपले आचरण असेल, असे आपल्या प्रबोधनातून समाजामध्ये रुजवितात. संविधान बांधिलकी महोत्सव आयोजित करून देशाचा नागरिक म्हणून माझी माझ्या देशाबद्दलची बांधिलकी काय आहे, हे समजावून सांगतात. संकुचित विचारांना दूर सारून व्यापक विचार करण्यास प्रवृत्त करतात. निव्वळ प्रास्ताविकेचे वाचन नकोसंविधानाची प्रास्ताविका ही स्वयंप्रेरणेने घेतलेली प्रतिज्ञा आहे. त्यामुळे संविधान दिनाला निव्वळ प्रास्ताविकेचे वाचन करून चालणार नाही. संविधानाचा मुख्य कार्यक्रम जो नागपुरात होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षक ांना संविधानाची मूल्ये अभ्यासक्रमात कशी येतील, हे सांगितले पाहिजे. ते आचरणात कसे येईल, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. प्रा. सुशील मेश्राम, संविधानाचे पुरस्कर्ते
संविधान हे जगण्याचे तत्त्वज्ञान व्हावे
By admin | Updated: November 26, 2015 03:30 IST