नागपूर : भोसलेकालीन सक्करदरा तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, येथे जागोजागी घाण साचली आहे. या तलावाकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. तलावाचे संवर्धन करावे, या मागणीसाठी युवा चेतना मंचतर्फे मूक आंदोलन करण्यात आले.
एकेकाळी सक्करदरा तलाव हा दक्षिण नागपूरची शान होता. मात्र आता सक्करदरा तलावाच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत पूर्णपणे जीर्ण झाली आहे त्यामुळे केव्हाही दुर्घटना घडू शकते व यात जीवितहानीदेखील होऊ शकते. अनेक वर्षांपासून तलावाचे सौंदर्यीकरण झालेले नाही. येथील बगिच्याची काही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे परंतु संबंधिताने संपूर्ण बगिच्यात अतिक्रमण केले आहे. या सर्व गोष्टी डोळ्समोर असतानादेखील नागपूर महानगरपालिका व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तलावात पाणी नसल्याने दत्तात्रयनगर व परिसरातील भूजल पातळी ३ मीटर खाली गेली आहे. जर आताच पावले उचलली नाहीत तर भविष्यात परिसरात मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी भूमिका युवा चेतना मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश शिवाजीराव महाडिक यांनी मांडली. तलावाच्या आत उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलीप दिवटे, महेश महाडिक. दत्ता शिर्के, विवेक पोहाणे, प्रवीण घरजाळे, विवेक सूर्यवंशी, आशिष खडके, सचिन चौधरी, विशाल बोडके, ओम आरेकर, अभिषेक सावरकर, राहुल बांबल, नीलेश गोमासे, आनंद कोतेवार, विवेक बाळबुधे, चेतन बावनकुळे, आशिष चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.