नागपूर : लोकसभेचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार जागा गमविल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी परतीसाठी कंबर कसली होती. मात्र, विधानसभेच्या सहाही मतदारसंघात कमळ फुलल्याने काँग्रेस नेत्यांची हिम्मत खचली आहे. ‘कम बॅक’च्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. पूर्व, दक्षिण व दक्षिण पश्चिममध्ये ६० हजारावर आघाडी, पश्चिम व मध्यमध्ये ४० हजारावर लीड व उत्तरेलाही लावलेला सुरुंग पाहता येत्या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसला एक एक जागा वाचविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. विधानसभेच्या सहा जागांपैकी उत्तर नागपूर (रोहयो मंत्री नितीन राऊत) व दक्षिण नागपूर (आ. दीनानाथ पडोळे) या दोनच जागा काँग्रेसकडे आहेत. उर्वरित चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. लोकसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजपने भरभरून आघाडी घेतली आहे. त्यामुळे गेल्यावेळी हरलेले व या वेळी लढण्यासाठी पूर्ण तयारी केलेल्या काँग्रेस नेत्यांसह काँग्रेसच्या सिटिंग आमदारांसाठीही धोक्याची घंटा आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पूर्वची लीड कमी करू शकले नाहीत. स्वत: ३५ हजारांनी जिंकलेले आ. दीनानाथ पडोळे काँग्रेसला पुढे ठेवू शकले नाहीत. आजवर कधीही भाजप पुढे न राहिलेल्या नितीन राऊत यांच्या उत्तरमध्येही भाजपने १८ हजारावर आघाडी घेत झेंडा रोवला. पश्चिमची भाजपची लीड पाहता येथेही काँग्रेसच्या आशा मावळल्या आहेत. काँग्रेसचे ‘बुरे दिन’ येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसने घेतली विधानसभेची धास्ती
By admin | Updated: May 18, 2014 00:59 IST