विलास गरुड : नोटाबंदीचा भाजपलाही फटका, बसपा राहील पहिल्या क्रमांकावर नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे आणि नोटाबंदीनंतर भाजपही मागे पडणार आहे, अशी जाहीर टीका बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केली. आगामी महापालिका निवडणुकीत बसपा हाच पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. चंद्रमणीनगर चौक येथे बसपाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. बसपातर्फे हा दिवस जनकल्याण योजना दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी गौरीप्रसाद उपासक प्रमुख अतिथी होते. यावेळी गरजूंना साहित्य व आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. विलास गरुड म्हणाले, मायावती यांनी संघर्षातून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. तेव्हा त्यांच्या संघर्षापासून प्रेरणा घ्या. कांशीराम यांनी त्यांना जी जबाबदारी सोपविली ती त्यांनी पार पाडली. आज त्या पक्षाच्या प्रमुख पदावर विराजमान आहेत. ही गोष्ट बसपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने लक्षात घ्यावी. नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक २५ वर्षांपासून रखडत ठेवले हा बाबासाहेबांचा अपमान असून या अपमानाचा बदला घ्या आणि आगामी महापालिकेमध्ये बसपाचाच महापौर बनवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गौरीप्रसाद उपासक यांनी यावेळी उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता येईल आणि मायावती या पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. यावेळी बसपाचे उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रभारी प्रेम रोडेकर, महासचिव जितेंद्र्र म्हैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे, उत्तम शेवडे, रमेश लोखंडे, किशोर कैथेल, डॉ.राजेंद्र पडोळे, मंडल कॉर्डिनेटर रूपेश बागेश्वर, पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विवेक हाडके, नगरसेवक गौतम पाटील, सत्यभामा लोखंडे, अजय डांगे, आदिवासी नेते प्रभु कालसर्पे हर्षला जैस्वाल, नरेश वासनिक, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, रोहित वालदे, योगेश लांजेवार, प्रफुल मानके, अभिषेक शंभरकर, मो. जमाल, संजय सोमकुंवर, हर्षवर्धन डोइफोड़े पंकज ताकसांडे, जितेन्द्र घोडेस्वार, सदानंद जामगडे, कपिल राऊत, मनोज रहाटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादी संपली
By admin | Updated: January 16, 2017 01:58 IST