पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली
नागपूर: लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नेत्यांनी राजीनामा देण्याचे सत्र काँग्रेसमध्ये सुरूच आहे. शनिवारी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता गावंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठविला. शुक्रवारी निकालानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार मुकुल वासनिक यांचा दारुण पराभव झाला. जिल्ह्यातील सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघत काँग्रेसचा एक व राष्ट्रवादीचा एक असे दोन आमदार आहेत. पण वासनिक यांना एकाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गावंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुनीता गावंडे याच जिल्हाध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात रामटेकमध्ये काँग्रेसला विजयी झाली. शिवसेनेकडे गेलेला मतदारसंघ परत खेचण्यात यश आले होते. या निवडणुकीतही गावंडे पक्षाची संघटनात्मक बांधणी केली. मेळावे, शिबिरे, बैठका घेतल्या. मात्र, त्यांनंतरही अपेक्षित यश मिळाले नाही. चित्र वेगळेच झाले. राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आहेत. मात्र, ते मंजूर करण्यात आले की नाही हे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केलेले नाही. याबाबत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)