नागपूर : एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या श्रीसूर्या समूहाच्या ११ बसगाड्या श्रीराम फायनान्स या खासगी वित्त कंपनीला सशर्त सुपूर्दनाम्यावर दिल्या. श्रीसूर्या समूहाचे सर्वेसर्वा समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून पाच हजारावर गुंतवणूकदारांची २४७ कोटी १४ लाख ५९ हजार ४४४ रुपयांनी फसवणूक उजेडात येता त्यांच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दाम्पत्याच्या अटकेनंतर पोलिसांनी जागोजागी झडत्या घेऊन ११ बसगाड्या जप्त केल्या होत्या. या बसगाड्या आपणास सुपूर्दनाम्यावर देण्यात याव्यात, अशी विनंती करणारा अर्ज श्रीराम फायनान्सने न्यायालयात दाखल केला होता. या बसगाड्या आपण खरेदी केलेल्या आहेत. अचानक श्रीसूर्याचे प्रकरण उद्भवून या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त बसगाड्या हल्ली धूळखात पडलेल्या आहेत. या बसगाड्या शर्ती लादून आमच्या ताब्यात देण्यात याव्यात. न्यायालयाने या वित्त कंपनीच्या नावे बसगाड्यांचा सुपूर्दनामा देताना आपल्या आदेशात असे म्हटले की, बसगाड्यांचा ताबा घेणाऱ्या कंपनीने एक कोटी रुपयांची बँक हमी द्यावी, मूळ बसगाड्यांमध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, रंगही बदलविण्यात येऊ नये, जेव्हा न्यायालयाला गरज भासेल तेव्हा या बसगाड्या न्यायालयाच्या सुपूर्द करण्यात याव्यात. न्यायालयात वित्त कंपनीच्या वतीने अॅड. अमित बंड तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
श्रीसूर्याच्या ११ बसगाड्या वित्त कंपनीला सशर्त सुपूर्द
By admin | Updated: June 20, 2014 00:56 IST