लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : सावनेर-गाेंडखैरी या दाेन राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील बसस्थानक परिसरातील काही दुकानदारांची दुकाने ताेडण्यात आली. त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले हाेते. मात्र, अद्यापही देण्यात आली नाही. त्यामुळे या नुकसानग्रस्तांनी तहसीलदार सचिन यादव यांच्याकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
सावनेर-गाेंडखैरी हा मार्ग धापेवाडा येथून जात असून, येथील बसस्थानक परिसरात या मार्गालगत काहींनी त्यांची दुकाने थाटली हाेती. यात हाॅटेल, भाेजनालय, पिंजनालय, सायकल व माेटरसायकल दुरुस्ती, चहा व पानटपरी, फुलं व हार आदी दुकानांचा समावेश असून, ही दुकाने ३० वर्षांपासून असल्याने प्रत्येकाने त्या दुकानांच्या इमारतीचे पक्के बांधकाम केले हाेते. सर्वे क्रमांक ५१०, ५११ व ५४१ मध्ये असलेल्या या दुकानांवर दुकानदारांचा उदरनिर्वाह चालायचा तसेच दुकानदार ग्रामपंचायत प्रशासनाला नियमित मालमत्ता व दिवाबत्ती करही द्यायचे.
सावनेर-गाेंडखैरी महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी ही दुकाने अतिक्रमित ठरवण्यात आली. प्रशासनाने दुकानांच्या जागेचे माेजमाप करून दुकानदारांना त्या जागेचा आर्थिक माेबदला देण्यात येणार असल्याचे सांगितले आणि नंतर ती दुकाने जमीनदाेस्त करण्यात आली. त्यामुळे त्या दुकानदारांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक वर्ष पूर्ण हाेऊनही प्रशासनाने आपल्याला नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे उपजीविका कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला असून, आपल्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही दुकानदारांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात विजय हिवरकर, फरजाना शेख, मनोहर ठाकरे, दिगांबर लोखंडे, प्रमोद गोतमारे, माणिक चौधरी, मेहमूद शेख शब्बीर फारुकी, नत्थू वानखेडे, शेख रफीक याकूब शेख यांच्यासह अन्य दुकानदारांचा समावेश हाेता.